जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. जवळपास दोन दशकं बिहारचं नेतृत्व केल्यानंतर, संसद आणि विधानमंडळाच्या सर्व सभागृहांमध्ये सदस्य होण्याची आपली जुनी इच्छा होती, असं सांगितलं.
Bihar Chief Minister Nitish Kumar Resigns: बिहारच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असून आता राज्यसभेत जाण्याची तयारी करत आहेत. जवळपास दोन दशकं बिहारच्या सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर त्यांचा हा निर्णय राज्यातील राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत देत आहे.
नितीश कुमार यांना राज्यसभा का हवी आहे?
नितीश कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टद्वारे आपल्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, राजकारणात आल्यापासून त्यांच्या मनात एक विशेष इच्छा होती. त्यांना संसदेची दोन्ही सभागृहं (लोकसभा आणि राज्यसभा) आणि राज्याच्या विधानमंडळाची दोन्ही सभागृहं (विधानसभा आणि विधान परिषद) अशा चारही सभागृहांचा सदस्य होण्याची संधी मिळावी, असं त्यांना वाटत होतं.


