
मोहन भागवतांचा एकतेचा संदेश, ‘विश्वचैतन्य’ समजून वागा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपुरातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात पूजा केली आणि मंदिराच्या गर्भगृहाचे उद्घाटन केले. यावेळी मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी मानवतेला जोडणाऱ्या ‘विश्वचैतन्या’बाबत भाष्य केले.विश्वचैतन्य सर्वत्र व्यापलेले असून आपण सर्व एकाच ऊर्जेचे प्रकटीकरण आहोत, असे मोहन भागवत यांनी सांगितले. गणेश हे ऊर्जेचे प्रतीक असून संघटनेचा खरा अर्थही त्यातून स्पष्ट होतो, असे त्यांनी म्हटले.माणसाने स्वतःशी, इतरांशी आणि जगाशी असलेले वर्तन या परस्पर संबंधाच्या भावनेवर आधारित ठेवले, तर जगातील अडथळे आणि संकटे दूर होऊ शकतात, असे भागवत यांनी सांगितले.आज जगात दिसणारे अडथळे आणि संकटे ही माणसांनी परस्परांशी असलेली आपलेपणाची भावना विसरल्यामुळे निर्माण झाली आहेत, असेही त्यांनी म्हटले. वैयक्तिक, सामूहिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आचरण या भावनेवर आधारित असावे, असे आवाहन त्यांनी केले.