पंतप्रधान मोदींनी BRICS नेत्यांसाठी एका शानदार डिनरचं आयोजन केलं. यासाठी केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडू यांसारख्या विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलं होतं.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये आयोजित केलेल्या BRICS परिषदेच्या डिनरसाठी केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं, असं सरकारी सूत्रांनी रविवारी सांगितलं.
भारताने राजधानी दिल्लीत १८ व्या BRICS शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. यानिमित्ताने BRICS सदस्य देश आणि भागीदार देशांचे नेते आणि वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र आले आहेत. याच पार्श्वभूमीवर हे आमंत्रण देण्यात आलं होतं.
पंतप्रधान मोदींनी BRICS नेते आणि प्रतिनिधींसाठी आयोजित केलेल्या या डिनरला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि एनडीए-शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
या डिनरला केंद्रीय मंत्री अमित शाह, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू, प्रल्हाद जोशी, जेपी नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेही उपस्थित होते.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस हे देखील या डिनरला उपस्थित होते.
BRICS नेत्यांकडून 'नवी दिल्ली घोषणापत्र 2026' मंजूर
BRICS नेत्यांनी एकमताने 'नवी दिल्ली घोषणापत्र 2026' स्वीकारल्यानंतर काही तासांतच या डिनरचं आयोजन करण्यात आलं. या घोषणापत्रात जागतिक प्रशासनात सुधारणा आणि विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी या परिषदेच्या फलनिष्पत्तीचं वर्णन करताना म्हटलं की, हे 'अधिक व्यापक आणि मजबूत उद्देशाच्या' BRICS चं प्रतिबिंब आहे.
या घोषणापत्रात पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, परिस्थिती आणखी बिघडवणाऱ्या कृती टाळण्याचं आणि जास्तीत जास्त संयम बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नागरिकांचं आणि नागरी पायाभूत सुविधांचं संरक्षण, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्यावरही भर देण्यात आला आहे. या प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य टिकवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून अधिक प्रयत्न करण्याची गरजही यात व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जागतिक व्यापार, पुरवठा साखळी आणि ऊर्जेचा प्रवाह सुरळीत ठेवण्याची गरजही यात अधोरेखित करण्यात आली आहे.
राजकीय चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
या डिनरसोबतच नवी दिल्लीने शांतता प्रस्थापित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. BRICS परिषदेच्या निमित्ताने इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली.
डिनरमध्ये 'नवरस - द युनिव्हर्स ऑफ शेअर्ड इमोशन्स' नावाचा एक खास सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात BRICS देशांच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचं आणि विविधतेचं दर्शन घडलं.
या कार्यक्रमात 'BRICS सिंफनी - वन रिदम, मेनी कल्चर्स' हा एक विशेष संगीतमय कार्यक्रमही होता. यात BRICS सदस्य आणि भागीदार देशांतील संगीतकार एकत्र आले होते.
या सादरीकरणात BRICS देशांच्या विविध संगीत परंपरा आणि वाद्यांचा मिलाफ भारताच्या शास्त्रीय नृत्य परंपरेशी करण्यात आला होता. यातून BRICS कुटुंबातील सामायिक बंधांचं प्रतीक दर्शवण्यात आलं.
परिषदेची संकल्पना आणि मुख्य भर
१८ वी BRICS शिखर परिषद 'बिल्डिंग फॉर रेझिलिअन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी' या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विकास, शाश्वतता आणि नवनिर्मिती यावर मुख्य भर देण्यात आला.


