Madhya Pradesh Youth Ends Life on Instagram Live After Greeting Friends: मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २२ वर्षांच्या तरुणाने इन्स्टाग्राम लाईव्हवर मित्रांना 'हाय' म्हटलं आणि काही वेळातच आपलं आयुष्य संपवलं. त्याच्या मित्रांनी लाईव्ह पाहिलं, पण ते पोहोचेपर्यंत उशीर झाला होता.

Madhya Pradesh Youth Ends Life on Instagram Live After Greeting Friends शिवपुरी (मध्य प्रदेश): इन्स्टाग्रामवर लाईव्ह यायचं, मित्रांना 'हाय' करायचं आणि काही क्षणात जगाचा निरोप घ्यायचा... मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्ये अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. २२ वर्षांच्या मनोज रजक नावाच्या तरुणाने इन्स्टाग्राम लाईव्हवर येत आपलं आयुष्य संपवलं. धक्कादायक म्हणजे, हे लाईव्ह पाहणारे त्याचे मित्र धावत त्याच्या घरी पोहोचले, पण तोपर्यंत मनोजचा जीव गेला होता.

नेमकं काय घडलं?

शिवपुरीमध्ये राहणारा मनोज रजक हा प्लंबर म्हणून काम करायचा. सोबतच तो काही गारमेंट्सची उत्पादनंही विकायचा. तो एका भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. घटनेच्या दिवशी तो इन्स्टाग्रामवर लाईव्ह आला. त्याने सुरुवातीला आपल्या सर्व मित्रांना 'हाय' केलं आणि त्यानंतर त्यांना फ्लाइंग किस दिली. यानंतर त्याने लाईव्ह चालू असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली.

जेव्हा मनोज इन्स्टाग्रामवर लाईव्ह आला, तेव्हा सुरुवातीला त्याच्या मित्रांचं लक्ष गेलं नाही. काही वेळाने नोटिफिकेशन पाहिल्यावर त्यांना काहीतरी विचित्र वाटलं. त्यांनी मनोजला फोन केला, पण त्याने उचलला नाही. त्यामुळे त्याचे दोन मित्र लगेच त्याच्या भाड्याच्या घराकडे धावले. पण तिथे पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. मनोजने आपलं आयुष्य संपवलं होतं.

पोलिसांनी मोबाईल जप्त केला

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि मनोजच्या खोलीची झडती घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही, पण त्यांनी त्याचा मोबाईल फोन जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आईच्या मृत्यूनंतर वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा धक्का

पोलिसांच्या प्राथमिक तपासात एक भावनिक कारण समोर आलं आहे. मनोज त्याच्या आई-वडिलांवर खूप प्रेम करायचा. पण वर्षभरापूर्वी त्याच्या आईचं आजारपणामुळे निधन झालं. आईच्या जाण्याने तो पूर्णपणे खचून गेला होता. या दुःखातून तो सावरत असतानाच, काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि ते वेगळ्या घरात राहू लागले.

आई गेली आणि वडिलांनीही दुसरं लग्न केल्याने मनोज एकाकी पडला होता. तो भाड्याच्या घरात एकटाच राहत होता आणि याच कारणामुळे तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता, असं त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितलं आहे.