भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा मॉक ड्रिल होणारय. "ऑपरेशन सिंदूर" नंतर पहिल्यांदाच ही मॉक ड्रिल होते, युद्धजन्य परिस्थिती, दहशतवादी हल्ल्यांसाठी नागरिकांची तयारी तपासली जाणारय.

नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण हालचाली सुरू होण्याची चिन्हं आहेत. उद्या म्हणजेच २९ मे रोजी, पाकिस्तानला लागून असलेल्या गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर या चार सीमावर्ती राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा मॉक ड्रिल होणार आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ही मॉक ड्रिल "ऑपरेशन सिंदूर" नंतर पहिल्यांदाच होत आहे. ६ आणि ७ मेच्या रात्री भारतीय सैन्यानं केलेल्या या गुप्त ऑपरेशनमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यावेळी अवघ्या २५ मिनिटांत भारतीय हवाई दलानं ९ दहशतवादी तळ नष्ट केले होते.

मॉक ड्रिलमागचं कारण काय?

देशात सध्या वाढलेल्या सुरक्षा तणावाच्या पार्श्वभूमीवर ही मॉक ड्रिल होत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचे आदेश दिले होते. आता, सीमेवरील चार महत्त्वाच्या राज्यांमध्ये ही मॉक ड्रिल होत असल्याने पुन्हा एकदा एखादी मोठी कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर आणि सुरक्षा विश्लेषकांमध्ये यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे.

मॉक ड्रिलमध्ये काय होणार आहे?

ही मॉक ड्रिल नागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केली जात आहे. युद्धजन्य परिस्थिती किंवा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सामान्य नागरिक आणि स्थानिक यंत्रणा कितपत सज्ज आहेत, हे तपासलं जाणार आहे. आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी कसे वागायचं, गोंधळ न करता योग्य कृती कशी करायची, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलचे महत्त्व

सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल म्हणजे फक्त सैनिकी तयारी नव्हे, तर सामान्य नागरिकांसाठीचा एक जीवनरक्षक अभ्यासक्रम आहे. आपत्ती किंवा हल्ल्याच्या प्रसंगी स्वतःचं आणि इतरांचं संरक्षण कसं करायचं, याचे धडे या माध्यमातून दिले जातात. विशेषतः सीमावर्ती भागांतील नागरिकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक ठरतं.

सावध, पण शांत राहा

या मॉक ड्रिलच्या वेळी नागरिकांनी सावध, सतर्क आणि शांत राहणं आवश्यक आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं हाच नागरिकांचा देशहितातील खरा सहभाग ठरेल.

उद्या सीमेवर काय होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. मॉक ड्रिलचा उद्देश तयार राहणे असला तरी, यामागे काही अधिक मोठं नियोजन आहे का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.