IAS Verma Apologizes For Brahmin Daughter Remark : IAS संतोष वर्मा यांच्या “ब्राह्मण मुलगी” या वक्तव्यावरून वाद वाढला आहे. ब्राह्मण समाजाने हे वक्तव्य जातीयवादी असल्याचे सांगत FIR आणि कारवाईची मागणी केली आहे.
IAS Verma Apologizes For Brahmin Daughter Remark : मध्य प्रदेशातील अनुसूचित जाती-जमाती अधिकारी कर्मचारी संघाचे (AJJAKS) प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ IAS अधिकारी संतोष वर्मा यांनी भोपाळमधील एका कार्यक्रमात केलेल्या टिप्पणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याप्रकरणी पोलीस केस आणि शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी जोर धरत आहे. आर्थिक आधारावर आरक्षण दिले पाहिजे की नाही, यावर बोलताना ते म्हणाले, "जोपर्यंत एखादा ब्राह्मण आपली मुलगी माझ्या मुलाला दान देत नाही किंवा त्याच्याशी नातेसंबंध ठेवत नाही, तोपर्यंत आरक्षण सुरूच राहिले पाहिजे."
अखिल भारतीय ब्राह्मण समाजाने केली केस दाखल करण्याची मागणी
अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचे प्रदेशाध्यक्ष पुष्पेंद्र मिश्रा यांनी वर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करत ते "अभद्र" आणि "जातिवादी" असल्याचे म्हटले. मिश्रा यांनी आरोप केला की, हे वक्तव्य ब्राह्मण मुलींचा अपमान करणारे असून अखिल भारतीय सेवा आचार नियमांचे उल्लंघन करणारे आहे. X वरील एका पोस्टमध्ये मिश्रा म्हणाले, “ब्राह्मण मुलींविरुद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल त्वरित FIR दाखल व्हायला पाहिजे. IAS अधिकाऱ्याची टिप्पणी अभद्र, आक्षेपार्ह आणि ब्राह्मण समाजाचा अपमान करणारी आहे. जर लवकरच गुन्हा दाखल झाला नाही, तर ब्राह्मण समाज राज्यभर आंदोलन करेल.”
सरकारने कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरू
पुष्पेंद्र मिश्रा म्हणाले की, अशा वेळी ही टिप्पणी करणे चुकीचे आहे, जेव्हा लाडली लक्ष्मी, लाडली बहना आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या योजना मुलींचा सन्मान आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करतात. मिश्रा यांनी इशारा दिला की, जर सरकारने कारवाई केली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.
IAS वर्मा यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले...
वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, IAS वर्मा यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हटले, “राजकीय गदारोळ निर्माण करणे हा माझा हेतू नव्हता. मी म्हणालो होतो की, जर मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे आणि आता सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, तर माझ्या मुलांना समाजाकडून 'रोटी-बेटी'सारखी वागणूक मिळाली पाहिजे. माझ्या मनात कोणत्याही समाजाबद्दल वाईट भावना नाही. मला महिलांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. जर मी कोणाला दुखावले असेल, तर मी माफी मागतो. पण काही लोकांनी माझ्या बोलण्याचा केवळ एक भागच पसरवला.”


