“मला भाजपमध्ये येण्यास भाग पाडले जात आहे”- अरविंद केजरीवालांचा दावा

| Published : Feb 04 2024, 06:57 PM IST / Updated: Feb 04 2024, 07:10 PM IST

Arvind Kejriwal

सार

मला भाजपमध्ये येण्यास भाग पाडले जात आहे परंतु मी झुकणार नाही असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

Arvind Kejriwal Delhi: भाजपाने दिल्लीतील सरकार पाडण्याचा कट रचला असा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षाने (AAP) केला आहे. मला भाजपमध्ये येण्यास भाग पाडले जात आहे परंतु मी झुकणार नाही असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

'आप'च्या आमदारांना विकत घेण्यासाठी भाजप प्रत्येकी 25 कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. याप्रकरणी भाजप नेत्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मंत्री आतिषी यांच्या घराच्या फेऱ्या मारत आहेत.

मी झुकणार नाही - केजरीवाल

दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. मला भाजपमध्ये येण्यास भाग पाडले जात असल्याचे त्यांनी रविवारी सांगितले. परंतु कितीही भाग पाडले तरी आपण झुकणार नसल्याचे केजरीवाल म्हणाले. दिल्लीतील रोहिणी येथे शाळेच्या पायाभरणीनंतर केजरीवाल म्हणाले, “ते कुणाच्या विरोधात काहीही कट करू शकतात. पण मीही ठाम आहे. मी झुकणार नाही. ते मला भाजपमध्ये येण्यास सांगत आहेत. त्यानंतरच ते मला सोडतील. पण मी ठामपणे सांगितले आहे की मी भाजपमध्ये जाणार नाही. मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही, अजिबात नाही.”

दिल्ली पोलिसांनी मागितला पुरावा

आमदार विकत घेतले जात आहेत या आरोपांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे पुरावा मागितला आहे. भाजपने आमदार खरेदीसाठी 25-25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याच्या आरोपाबाबत दिल्ली पोलीस केजरीवाल यांच्याकडे चौकशी करत आहेत. केजरीवाल यांना सोमवारपर्यंत पुरावे देण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यात केजरीवाल यांनी X वर पोस्ट करून भाजप दिल्ली सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला होता. त्यांना दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्याची तयारी सुरू आहे. आणि आमदारांना प्रत्येकी 25 कोटी रुपये आणि भाजपचे तिकीट देऊ केले जात आहे. असे वादग्रस्त वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते.

केजरीवालांनी म्हटले की,”आप'च्या सात आमदारांशी संपर्क साधण्यात आल्याचा होता. त्यांचे 21 आमदारांशी बोलणे झाले होते. परंतु त्यांचे सगळे कट फसतील. आमच्या सरकारने किती काम केले हे दिल्लीतील जनतेला माहीत आहे.”

एका मीडिया रिपोर्टनुसार, केजरीवाल यांनी आपल्या भाषणात असाही आरोप केला की, “भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार राष्ट्रीय अर्थसंकल्पाच्या केवळ 4 टक्के रक्कम शाळा आणि रुग्णालयांवर खर्च करते आहे तर दिल्ली सरकार दरवर्षी आपल्या बजेटच्या ४० टक्के रक्कम शाळा आणि रुग्णालयांसाठी खर्च करते. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांचे तुरुंगातील सहकारी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचाही उल्लेख केला. अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'आज सगळ्या एजन्सी आमच्या मागे लागल्या आहेत. मनीष सिसोदिया यांची चूक फक्त एवढीच आहे की ते चांगल्या शाळा बांधत होते. सत्येंद्र जैन यांची चूक आहे की ते चांगले रुग्णालय आणि क्लिनिक बांधत होते.”

आणखी वाचा -

लडाखमध्ये पूर्ण राज्याच्या मागणीसाठी वातावरण तापले, हजारो लोक उतरले रस्त्यावर

उत्तर प्रदेश ATS ची मोठी कारवाई, ISI एजंटला मेरठमध्ये अटक

तुमचे स्वप्न हा माझा संकल्प,त्यात कोणतीही कसर सोडणार नाही-पंतप्रधान मोदी