बंगळुरूमध्ये पावसामुळे झालेल्या ट्रॅफिकमध्ये एक व्यक्ती तब्बल २ तास १५ मिनिटे अडकला, ज्यामुळे त्याची फ्लाईट जवळपास चुकलीच होती. पण एअरपोर्टला पोहोचल्यावर DigiYatra आणि उत्तम व्यवस्थापनामुळे तो फक्त नऊ मिनिटांत डिपार्चर गेटवर पोहोचला. त्याचा हा अनुभव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
इंदिरानगर ते केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा एक निराशाजनक प्रवास सध्या बंगळुरूच्या ट्रॅफिक, पायाभूत सुविधा आणि एअरपोर्टच्या अनुभवावरच्या चर्चेचं कारण ठरला आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) युझर नितीन शर्मा यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. थोड्याशा पावसानंतर त्यांना इंदिरानगरहून एअरपोर्टला पोहोचायला तब्बल २ तास १५ मिनिटे लागली. त्यामुळे आपली फ्लाईट चुकणारच असं त्यांना वाटत होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एअरपोर्टवर पोहोचल्यावर एन्ट्री पॉईंटपासून डिपार्चर गेटपर्यंत पोहोचायला त्यांना फक्त नऊ मिनिटे लागली. याचं श्रेय त्यांनी DigiYatra आणि एअरपोर्टच्या कार्यक्षम कारभाराला दिलं आहे.
या पोस्टमधून बंगळुरूच्या रस्त्यांवरील प्रचंड गर्दी आणि तिथला अत्यंत सुलभ एअरपोर्ट अनुभव यातील विरोधाभास समोर आला आहे. शर्मा यांनी म्हटलंय की, शहरातल्या पायाभूत सुविधा इतक्या खराब असताना, बंगळुरू जगभरातील टॅलेंटला कसं आकर्षित करू शकेल, असा प्रश्न त्यांना या प्रवासात पडला. त्यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी एअरपोर्टसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करण्याची गरज व्यक्त केली, तर काहींनी बंगळुरू ट्रॅफिक आणि DigiYatra वापरण्याचा स्वतःचा अनुभव सांगितला.
बंगळुरूच्या ट्रॅफिकने प्रवासी वैतागला
नितीन शर्मा यांनी एक्सवर आपला अनुभव सांगताना म्हटलं की, इंदिरानगर ते एअरपोर्ट हे तुलनेने कमी अंतर असूनही त्यांना जायला २ तास १५ मिनिटे लागली.
या विलंबाला त्यांनी पाऊस जबाबदार असल्याचं म्हटलं. फ्लाईट मिळेल याची आशा त्यांनी जवळजवळ सोडूनच दिली होती. प्रवासात ते मनातल्या मनात राजकारण्यांना दोष देत होते आणि विचार करत होते की, अशा मूलभूत सुविधा नसताना बंगळुरूमध्ये उत्तम टॅलेंट कसं येणार?
पण, एअरपोर्टवर पोहोचल्यावर त्यांचा अनुभव पूर्णपणे बदलला.
एअरपोर्टमध्ये एन्ट्री ते डिपार्चर गेट फक्त नऊ मिनिटांत
शर्मा यांनी सांगितलं की, एअरपोर्टच्या प्रवेशद्वारापासून डिपार्चर गेटपर्यंत पोहोचायला त्यांना फक्त नऊ मिनिटे लागली. या जलद आणि सोयीस्कर प्रक्रियेचं श्रेय त्यांनी DigiYatra आणि एअरपोर्टच्या उत्तम कार्यप्रणालीला दिलं.
त्यांनी या अनुभवाला बंगळुरूमधील एक उत्तम उदाहरण म्हटलं आहे, जिथे रस्त्यांवरील ट्रॅफिकच्या सततच्या समस्या असूनही डिजिटल पायाभूत सुविधांमुळे आयुष्य कसं सोपं होऊ शकतं हे दिसतं.
पोस्टच्या शेवटी त्यांनी शहराबद्दल एक मार्मिक टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, "बंगळुरू हे असं शहर आहे जे आशावादी आणि निराशावादी या दोघांनाही निराश करतं."
सोशल मीडियावर युझर्सच्या प्रतिक्रिया
या पोस्टनंतर अनेक युझर्सनी बंगळुरूची एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी, ट्रॅफिक आणि DigiYatra अनुभवावर आपली मतं मांडली.
एका युझरने कमेंट केली: "एअरपोर्ट एक्सप्रेस लाईन सुरू केल्यास मदत होऊ शकते. दिल्लीमध्ये ही सिस्टीम खूप चांगली चालते."
दुसऱ्या एका युझरने लिहिलं: "पण बंगळुरू म्हणजे बंगळुरू आहे. भयानक ट्रॅफिक आणि गोंधळ असूनही, मी शहराच्या मध्यभागी - इंदिरानगरमध्येच राहणं पसंत करतो."
तिसऱ्या युझरने लिहिलं: "काल माझीही अशीच अवस्था झाली होती, कशीबशी फ्लाईट पकडली! पण चेक-इननंतर डिजीयात्रामुळे सगळं अगदी सोपं झालं."
चौथ्या युझरने कमेंट केली: "मी डिजीयात्रा वापरत नाही, पण एअरपोर्टचा अनुभव कधीच वाईट नव्हता."
या प्रतिक्रियांमधून बंगळुरूमधील एक नेहमीची चर्चा पुन्हा समोर आली आहे, जिथे नागरिक एअरपोर्टच्या डिजिटल सुविधांचं कौतुक करत आहेत, पण त्याचवेळी रस्त्यांवरील गर्दी आणि शहरातून एअरपोर्टला जाण्यासाठी जलद पर्यायांच्या अभावावर चिंता व्यक्त करत आहेत.
