बंगळूरमधील एका CEO ने त्यांच्या ऑफिसमधील एका फ्रेशरला रोज ऑफिसला येण्या-जाण्यासाठी ३५० रुपये खर्च करावे लागतात, अशी पोस्ट केली आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. यानंतर तरुणांचे पगार, घरभाडं, प्रवासाचा खर्च आणि शहरात राहणं किती परवडतं, यावर अनेकजण बोलू लागले आहेत.

बंगळूरमध्ये राहण्याचा आणि प्रवासाचा वाढता खर्च हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. एका कंपनीचे संस्थापक आणि CEO, संकेत शेठ यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी शहरात काम करणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी मांडल्या आहेत. त्यांच्या पोस्टनुसार, त्यांच्या ऑफिसमधील एका फ्रेशर मुलाला लालबाग जवळच्या घरातून HSR मधील ऑफिसला येण्यासाठी दररोज तब्बल ३५० रुपये खर्च करावे लागतात.

ही चर्चा अशा वेळी सुरू झाली आहे, जेव्हा २०,००० ते ३०,००० रुपये महिना कमावणाऱ्या फ्रेशर्सना शहरात टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनेक युझर्सनी म्हटलं आहे की, घरभाडं, जेवण, प्रवास आणि इतर आवश्यक खर्च भागवल्यानंतर, या तरुणांच्या हातात बचत करण्यासाठी किंवा स्वतःवर खर्च करण्यासाठी फारच कमी पैसे उरतात.

ऑफिसला पोहोचायला रोज ३५० रुपये

संकेत शेठ यांच्या म्हणण्यानुसार, तो फ्रेशर त्यांना म्हणाला, “सर, ऑफिस आने में ₹350 रोज लग जाते हैं.”

हा कर्मचारी लालबागजवळ राहत होता, तर कंपनीचे ऑफिस HSR मध्ये होते. HSR म्हणजे बंगळूरमधला एक पॉश आणि कमर्शियल भाग, जसं आपल्या मुंबईतलं वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC). बंगळूरमधील रस्त्यांची अवस्था आणि वाहतूक कोंडी पाहता, त्याचे पालक त्याला स्कूटर चालवण्यास परवानगी देत नव्हते.

सार्वजनिक वाहतूक (Public transport) हा पर्यायही सोपा नव्हता. शेठ यांनी सांगितले की, बस किंवा मेट्रोने प्रवास करायला एका बाजूला जवळपास दोन तास लागतात, ज्यात अनेक ठिकाणी गाड्या बदलाव्या लागतात आणि स्टेशनपासून ऑफिसपर्यंत वेगळा प्रवास करावा लागतो. त्यामुळे रिक्षा आणि बस असा प्रवास मिळून त्याला रोज ३५० रुपये मोजावे लागत होते.

ज्याला नुकताच पहिला पगार मिळायला लागला आहे, त्याच्यासाठी महिन्याला सुमारे ७,००० ते ८,००० रुपये फक्त प्रवासावर खर्च करणे खूप मोठी गोष्ट आहे.

बंगळूर तरुणांना परवडेनासं झालंय का?

संकेत शेठ यांनी प्रश्न उपस्थित केला की, बंगळूरची ही वेगवान वाढच या शहराला त्या तरुणांसाठी न परवडणारे बनवत आहे का, जे या शहराच्या विकासात योगदान देतात?

त्यांच्या मते, २२ वर्षांच्या करिअरच्या सुरुवातीला असलेल्या तरुणाला ऑफिसला पोहोचण्याच्या खर्चाची चिंता करावी लागणं चुकीचं आहे. पहिला पगार तरुणांना स्वातंत्र्याची भावना देतो, ज्यामुळे ते लहान-सहान गोष्टी खरेदी करू शकतात, पैसे वाचवू शकतात आणि आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतात.

त्यांनी असा इशाराही दिला की, राहण्याचा आणि प्रवासाचा वाढता खर्च तरुणांच्या करिअरच्या निर्णयांवर परिणाम करू शकतो. तरुण कदाचित रिमोट जॉब्स निवडतील, ऑफिसला बोलावणाऱ्या नोकऱ्या टाळतील किंवा दुसऱ्या शहरांमध्ये संधी शोधतील.

बंगळूरची तरुण पिढी

शेठ यांनी बंगळूरच्या जडणघडणीत तरुण व्यावसायिकांच्या भूमिकेवर भर दिला. ते म्हणाले की, दरवर्षी हजारो तरुण-तरुणी मोठी स्वप्नं, नवीन कल्पना आणि धोका पत्करण्याची तयारी घेऊन या शहरात येतात.

त्यांनी युक्तिवाद केला की, हेच तरुण पुढे जाऊन बंगळूरमध्ये करिअर, कंपन्या आणि कुटुंबं उभी करतात. जर हे शहर त्यांच्यासाठीच खूप महाग झालं, तर हळूहळू ते आपलं भविष्य घडवणारे लोक गमावून बसेल.

शेठ यांनी हेही स्पष्ट केलं की, ही समस्या केवळ कंपन्यांनी सोडवण्यासारखी नाही, कारण स्वस्त आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराच्या पायाभूत सुविधांचा भाग आहे.

२०,००० किंवा २५,००० रुपये महिना कमावणाऱ्या तरुणासाठी प्रवासाचा खर्च हा केवळ एक खर्च नसून त्याच्या एकूण आर्थिक ओझ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, असं ते म्हणाले.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया?

या लिंक्डइन पोस्टमुळे युझर्समध्ये पगार, घरभाडं, जेवण आणि बंगळूरमधील प्रवासाच्या खर्चावर जोरदार चर्चा सुरू झाली.

एका युझरने कमेंट केली: “हो, जर एखादा फ्रेशर दुसऱ्या शहरातून येत असेल, तर त्याला पगारातील जवळपास अर्धा हिस्सा घरभाडं, जेवण आणि इतर खर्चांवर लावावा लागतो. २५-३० हजारांच्या पगारात त्याच्याकडे बचत करण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी काहीच उरत नाही. त्यामुळे तो कमी पगारात दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार करतो, जिथे किमान त्याला स्वातंत्र्य मिळेल.”

दुसऱ्या एका युझरने लिहिले: “'मॅक्रोइकॉनॉमी'मध्ये सुधारणा व्हायला हवी, पण मी त्याच शहरात घरकाम करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही कमी पगार लोकांना देणार.”

तिसऱ्या युझरने कमेंट केली: “त्यासाठीच तर BMTC (बंगळूरची बससेवा) चालवली जाते.”

या प्रतिक्रियांमधून बंगळूरमधील राहण्याचा खर्च, सार्वजनिक वाहतूक आणि करिअरच्या सुरुवातीला तरुणांवर येणारा आर्थिक ताण यावरची मोठी चर्चा दिसून येते.

परवडणारा प्रवास बंगळूरच्या भविष्यासाठी महत्त्वाचा

या चर्चेतून हे स्पष्ट होतं की, प्रवासाचा खर्च फ्रेशर्ससाठी, विशेषतः कमी पगारावर काम करणाऱ्यांसाठी, एक मोठं आर्थिक ओझं बनू शकतो. बंगळूर देशभरातील तरुणांना आकर्षित करत असलं तरी, घर, जेवण आणि वाहतुकीची परवडणारी सोय हे घटकच ते या शहरात स्थिरस्थावर होऊ शकतात की नाही हे ठरवतात.

त्यामुळे शेठ यांनी उपस्थित केलेला प्रश्न केवळ एका कर्मचाऱ्याच्या रोजच्या प्रवासापुरता मर्यादित नाही. जर बंगळूरला 'भारतातील संधींचे शहर' म्हणून आपली ओळख टिकवायची असेल, तर तरुणांना या शहरात राहून काम करता यावं, यासाठी परवडणारी आणि सोयीस्कर वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची ठरेल.