Amit Shahs Secret Strategy Leads to Nitish Kumars Exit : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका गुप्त योजनेचा भाग होता. यासाठी जवळपास महिनाभर चर्चा सुरू होती. या नव्या समीकरणानुसार, नितीश कुमार यांचा मुलगा निशांत उपमुख्यमंत्री होणार असून, जेडीयूला मंत्रिमंडळात जास्त जागा मिळणार आहेत.
Amit Shahs Secret Strategy Leads to Nitish Kumars Exit : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पडद्याआड आखलेल्या एका मोठ्या आणि गुप्त योजनेचा परिणाम आहे. कोणताही मोठा गाजावाजा न करता नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला करण्यात भाजपला यश आलं आहे. यासाठी जवळपास महिनाभर गुप्त बैठका आणि चर्चा सुरू होत्या. या नव्या फॉर्म्युलानुसार, नितीश कुमार यांच्याऐवजी त्यांचा मुलगा निशांत यांना उपमुख्यमंत्रीपद आणि जनता दल युनायटेडला (जेडीयू) मंत्रिमंडळात अधिक जागा मिळणार आहेत.
नितीश कुमार हे कधी कोणती राजकीय भूमिका घेतील, याचा अंदाज त्यांच्या जवळच्या लोकांनाही लावता येत नाही. त्यामुळे मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात ते सरकारसाठी एक आव्हान ठरू शकले असते. पण भाजपने कोणताही गोंधळ न होऊ देता नितीश कुमार यांना पायउतार होण्यास भाग पाडलं. गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केलं होतं आणि मोठा विजय मिळवला होता. या निवडणुकीत जेडीयूला ८५ आणि भाजपला ८९ जागा मिळाल्या होत्या. तेव्हाच अशी एक चर्चा होती की, प्रकृतीच्या कारणास्तव नितीश कुमार एक वर्षानंतर पद सोडतील. पण त्यांच्या प्रकृतीवरून विरोधकांनी टीका सुरू केल्याने, भाजपने पुढच्या सप्टेंबरपर्यंत वाट पाहू शकत नाही, अशी भूमिका घेतली.
यासाठी अमित शहा यांनी सुरुवातीला जेडीयूचे तीन मोठे नेते - केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह, राज्यसभा खासदार संजय झा आणि बिहारचे मंत्री विजय कुमार चौधरी यांच्याशी चर्चा सुरू केली. भाजपने नितीश कुमार यांचा मुलगा निशांत याला बिहार सरकारमध्ये महत्त्वाचं पद देण्याचा प्रस्ताव ठेवला. या तीन नेत्यांनी नितीश कुमार यांच्याशी चार वेळा चर्चा करून गेल्या महिन्याच्या अखेरीस त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. मात्र, बिहारमधील जेडीयूच्या काही नेत्यांनी निशांतच्या थेट राजकारणातील प्रवेशाला विरोध केला. त्याऐवजी निशांतने राज्यसभेत जावं, असा पर्याय त्यांनी सुचवला. नंतर, जेडीयू नेत्यांनी नितीश कुमार यांना समजावलं की, राज्यसभेच्या माध्यमातून सन्मानजनक निवृत्ती हाच सर्वोत्तम मार्ग आहे. शिवाय, राज्यसभेत सदस्य राहण्याची नितीश कुमार यांची इच्छाही नेत्यांनी त्यांना आठवून दिली. सध्याची जागा न स्वीकारल्यास बिहारमधून राज्यसभेवर जाण्यासाठी दोन वर्षे थांबावं लागेल, हेही त्यांना पटवून देण्यात आलं. अखेर नितीश कुमार यांनी या प्रस्तावाला होकार दिला.
राजकारणात येण्यास उत्सुक असलेल्या निशांतला सुरुवातीला वडिलांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय पटला नव्हता, पण नंतर तोही तयार झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नितीश कुमार यांच्या इतर नातेवाईकांना या सगळ्या घडामोडींची माहिती मंगळवारी मिळाली. त्यानंतर त्यांनी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी याला विरोध केला, पण तोपर्यंत नितीश कुमार यांनी निर्णय घेतल्याने त्यांच्या विरोधाला काही अर्थ उरला नाही. आता भाजप मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवणार असून, बदल्यात जेडीयूला बिहार मंत्रिमंडळात अतिरिक्त आठ मंत्रीपदे देण्याचं ठरलं आहे.


