Air India Crash: एका इटालियन वृत्तपत्राने अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान दुर्घटनेमागे घातपात असल्याचा दावा केला आहे. तपासानुसार, तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर जाणीवपूर्वक इंधन पुरवठा बंद केल्याने विमान कोसळले. 

मुंबई : गेल्या वर्षी अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान दुर्घटनेबाबत इटलीतील प्रमुख दैनिक कोरीएर डेला सेराने धक्कादायक दावा केला आहे. या अपघातामागे तांत्रिक बिघाड नव्हता, तर “जाणीवपूर्वक केलेली कृती” कारणीभूत असल्याचा निष्कर्ष तपासकर्त्यांनी काढल्याचे वृत्त या दैनिकाने नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मात्र, भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (DGCA) अंतिम अधिकृत अहवाल अद्याप प्रसिद्ध झालेला नसल्याने ठोस निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टमध्ये काय म्हटले आहे?

इटालियन वृत्तानुसार, १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा थांबल्यानंतर काही क्षणांतच विमान कोसळले. तपासकर्त्यांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, हा प्रकार यांत्रिक दोषामुळे झाला नसून इंधन नियंत्रण स्विच मॅन्युअली बंद करण्यात आल्याने घडला असावा. चौकशीत सहकार्य करणाऱ्या अमेरिकन तज्ज्ञांनी या निष्कर्षाला “ब्रेकथ्रू” किंवा मोठी प्रगती असे संबोधल्याचा दावा देखील वृत्तपत्राने केला आहे. अंतिम अहवाल तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.

दुर्घटना कशी घडली?

अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच विमान कोसळले. या दुर्घटनेत २६० जणांचा मृत्यू झाला. यात प्रवासी, विमान कर्मचारी तसेच ज्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर विमान कोसळले त्या ठिकाणचे लोक यांचा समावेश होता. या भीषण अपघातातून केवळ एकच प्रवासी बचावला. घटनेनंतर सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

प्राथमिक अहवालात काय नमूद?

जुलै २०२५ मध्ये भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरोने (AAIB) जाहीर केलेल्या प्राथमिक अहवालात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगचा उल्लेख होता. त्यामध्ये एक पायलट “तुम्ही इंधन का बंद केले?” असा प्रश्न विचारताना ऐकू येतो, तर दुसरा “मी तसे केले नाही” असे उत्तर देताना ऐकू आल्याचे नमूद करण्यात आले होते. ब्लॅक बॉक्स डेटाच्या आधारे केलेल्या तांत्रिक विश्लेषणात यांत्रिक बिघाडाचे ठोस पुरावे सापडले नसल्याचे सांगण्यात आले. उलट, इंजिन इग्निशन आणि शटडाउन नियंत्रित करणाऱ्या स्विचची मॅन्युअल हालचाल झाल्याचे संकेत मिळाल्याचे अहवालात नमूद आहे. दुर्घटनेच्या वेळी दोन्ही इंजिन बंद स्थितीत असल्याचेही स्पष्ट झाले होते.

वैमानिकांबाबतचे दावे

विमानाचे पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित सभरवाल होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर सह-वैमानिक होते. इटालियन दैनिकाच्या वृत्तानुसार, तपासकर्त्यांचा संशय एका वैमानिकावर केंद्रित आहे. तथापि, जबाबदारी अद्याप अधिकृतरीत्या निश्चित झालेली नाही. कॅप्टन सभरवाल यांच्याबाबत अपघातानंतर मानसिक आरोग्याशी संबंधित चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. वैमानिक संघटनांनीही प्राथमिक निष्कर्षांवर आक्षेप नोंदवला होता.

अंतिम अहवालात काय अपेक्षित?

इटालियन वृत्तपत्रानुसार, अंतिम तपास अहवालात वैमानिकांच्या नियमित मानसिक आरोग्य तपासणी आणि मानसशास्त्रीय मूल्यमापनाबाबत शिफारसी असण्याची शक्यता आहे. अपघातानंतर तांत्रिक दोष, मानवी चूक आणि अन्य कारणांबाबत विविध तर्क मांडले गेले होते. मात्र, तपास जसजसा पुढे गेला तसतसे लक्ष कॉकपिटमधील इंधन नियंत्रण स्विचवर केंद्रीत झाले. अधिकृत अंतिम अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच या दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत या सर्व दाव्यांकडे सावधगिरीने पाहणे आवश्यक आहे.