कॅप्टन सुमित सभरवाल हे AI-171 या लंडनकडे जाणाऱ्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचे मुख्य पायलट होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान कोसळले आणि संपूर्ण विमान जळून खाक झाले.

मुंबई - अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी घडलेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान दुर्घटनेत पवईतील जलवायू विहार सोसायटीचे रहिवासी आणि एअर इंडियाचे ज्येष्ठ पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने पवई परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या वेळी तेच विमान उडवत होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कॅप्टन सुमित सभरवाल हे AI-171 या लंडनकडे जाणाऱ्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचे मुख्य पायलट होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान कोसळले आणि संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघातात २४२ प्रवासी व क्रू सदस्य होते, त्यातील कोणताही प्रवासी वाचला नसल्याचे प्राथमिक अंदाज होते, मात्र नंतर एक प्रवासी जिवंत सापडल्याचे समोर आले.

आमदार दिलीप लांडे यांची सांत्वन भेट

घटनेनंतर स्थानिक शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी सुमित सभरवाल यांच्या पवईतील घरी जाऊन त्यांच्या ८८ वर्षीय वडिलांची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला.

आमदार लांडे म्हणाले, “सुमित एक उत्कृष्ट, शांत स्वभावाचा आणि शिस्तप्रिय पायलट होता. त्यांच्या कुटुंबातील दोघे भाचे देखील पायलट आहेत. ते दोघेही रात्री उशिरा मुंबईत पोहोचतील आणि नंतर अंतिमसंस्काराचा निर्णय घेतला जाईल.”

घरात दुःखद वातावरण

सुमित सभरवाल यांची आई कोविड काळात निधन पावली होती. सुमित गेली अनेक वर्षे आपल्या वडिलांसोबतच राहत होते आणि केवळ तीन दिवसांपूर्वी त्यांनी वडिलांना सांगितले होते की, "मी ही नोकरी सोडून पूर्ण वेळ तुझी सेवा करणार आहे."

मात्र नियतीने वेगळाच खेळ खेळला आणि तीनच दिवसांत सुमित यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जलवायू विहारमध्ये शोकसागर

पवईतील जलवायू विहार सोसायटीत सुमित सभरवाल यांचं वास्तव्य होतं. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात गहिवरलेले वातावरण आहे. शेजारी आणि सोसायटीतील रहिवासी त्यांच्याविषयी आपुलकीने बोलताना त्यांच्या मृदू स्वभावाचे आणि संयमशील वागणुकीचे अनेक किस्से सांगत आहेत.