Kangana Ranaut on Naseeruddin Shah : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली आहे. तर पियुष मिश्रा यांना पाठिंबा दिला आहे. शाह यांना 'लोमडी' (कोल्हा) म्हणत, कंगनाने स्वतःला देशाशी प्रामाणिक 'कुत्री' म्हटलं आहे.

मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका करणारे अभिनेते पियुष मिश्रा यांना पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मौनावर नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या टीकेनंतर हा वाद सुरू झाला होता.

कंगना रणौतची नसीरुद्दीन शाह - पियुष मिश्रा वादात उडी

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मिश्रा यांच्या वक्तव्याची बातमी शेअर करत थेट नसीरुद्दीन शाह यांच्यावर निशाणा साधला. शाह यांनी काही सेलिब्रिटींची तुलना "तोंडात हाडूक असलेला कुत्रा, जो भुंकू शकत नाही" अशी केली होती. यावर कंगनाने लिहिले, "खरं तर प्रत्येकजण कोणाचा ना कोणाचा कुत्रा असतोच, पण मला अभिमान आहे की मी ज्या घराचं (देशाचं) खाते, त्याचीच राखणदारी करते/त्यासाठी लढते. नसीर साहेब खातात तर या देशाचं, पण लढतात शेजारच्या देशासाठी."

कंगनाने कुत्र्यासोबत केलेल्या तुलनेचं समर्थन करत पुढे लिहिलं, "आजच्या काळात माणसाला कुत्रा म्हणणं ही एक प्रकारची स्तुतीच आहे, कारण प्रामाणिकपणा आणि गोडवा खूप दुर्मिळ झालाय. नसीरुद्दीन यांच्यासारखं 'लोमडी' (कोल्हा) होण्यापेक्षा मी 'कुत्री' होणंच पसंत करेन."

झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) पेपर लीक प्रकरणानंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पियुष मिश्रा यांनी शाह यांच्यावर टीका केली होती. मिश्रा यांनी बॉलिवूडच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दाही उचलून धरला होता.

झारखंड मुद्द्यावरून कंगनाची राहुल गांधींवर टीका

दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी भाजप खासदार कंगना रणौतने संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात थेट आंदोलन केलं. तिने "राहुल गांधी जवाब दो" असा बॅनर हातात घेतला होता. काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या झारखंडमध्ये भरती परीक्षेतील (JPSC/JSSC) गोंधळाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जबाबत तिने राहुल गांधींना जाब विचारला. गृहमंत्री अमित शहा विद्यार्थी आंदोलनावर उत्तर देण्यास तयार असतानाही राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप कंगनाने केला.

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात हजारो विद्यार्थी आणि सरकारी नोकरीसाठी तयारी करणारे उमेदवार आंदोलन करत आहेत. राज्यातील भरती परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि पेपर लीक झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांचा आहे.