डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल, तब्बल 11 वर्षांनंतर कुटुंबीयांना न्याय मिळणार?

| Published : May 09 2024, 05:54 PM IST

dr. narendra dabholkar

सार

11 वर्षांनंतर दाभोलकर हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालय 10 मे ला अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. सनातन संस्थेच्या ५ सदस्यांवर डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा आरोप असून पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून 10 मेला निकालपत्राचे वाचन करणार आहे.

पुणे : तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर कुटुंबीयांना न्याय मिळणार आहे. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालय 10 मे ला अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. सनातन संस्थेच्या ५ सदस्यांवर डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप असून पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून 10 मेला निकालपत्राचे वाचन करण्यात येणार आहे.

पुणे शहरात 20 ऑगस्ट 2013 ला डॉक्टर दाभोलकर मॉर्नीिग वॉल्कला गेले असता गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास आधी पुणे पोलीस आणि नंतर सीबीआयकडे सोपविण्यात आला. या दोन्ही यंत्रणांचा तपास चुकीचा ठरल्याचं पुढे निष्पन्न झाल्याने आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींन सोडून द्याव लागलं होतं.

कर्नाटकमधील एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना कर्नाटकातील या दोन हत्यांचा धागेदोरे सनातन संस्थेशी जोडले जात असल्याच आढळून आले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीतून दाभोलकरांच्या हत्येचा उलगडा झाला आणि आरोपींची नावे समोर आली. कर्नाटक पोलिसांनी ही माहिती सीबीआयला दिली आणि अटकसत्र सुरु झाले. सचिन अंदुरे, शरद कळसकर , डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली.

कोण होते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 रोजी सातारा जिल्ह्यात झाला. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉक्टर होण्याऐवजी त्यांनी समाजकार्यात स्वत:ला गुंतवून घेतले. 1982 सालापासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांचा पूर्ण सहभाग होता. 1989 मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. ही संस्था कोणत्याही प्रकारची सरकारी किंवा परकीय मदत न घेता काम करते. मात्र, अनेक कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटना त्यांना हिंदूविरोधी मानत होत्या. त्यांच्या हत्येनंतर गोविंद पानसरे, कर्नाटकात प्राध्यापक एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली.