US Iran Crisis : इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत असल्यामुळे, तिथल्या भारतीयांनी सुरक्षेसाठी मिळेल त्या वाहनाने देश सोडावा, अशी सूचना भारतीय दूतावासाने दिली आहे.
US Iran Crisis : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तातडीने देश सोडावा, असा सल्ला भारतीय दूतावासाने दिला आहे. 'सुरक्षेसाठी मिळेल त्या व्यावसायिक विमानाने किंवा इतर वाहनाने प्रवास करा,' असं दूतावासाने स्पष्ट केलं आहे.
५ जानेवारीला दिला होता पहिला इशारा
याआधी ५ जानेवारीला इराणमध्ये आंदोलनं सुरू झाली होती, तेव्हाही दूतावासाने भारतीयांसाठी एक सूचना जारी केली होती. पण आता अमेरिकेकडून युद्धाची भीती निर्माण झाल्याने ही नवीन आणि अधिक गंभीर सूचना देण्यात आली आहे. सध्या इराणमध्ये विद्यार्थी आणि इतर नागरिक मिळून सुमारे १०,००० भारतीय वास्तव्याला आहेत.
दूतावासाने आपल्या सूचनेत म्हटलं आहे की, 'इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता, सर्व भारतीय नागरिकांनी उपलब्ध व्यावसायिक विमानसेवा किंवा इतर वाहतुकीच्या साधनांनी देश सोडावा. आंदोलनं सुरू असलेल्या ठिकाणांपासून दूर राहावं. पासपोर्ट, ओळखपत्र आणि प्रवासाची इतर महत्त्वाची कागदपत्रं नेहमी स्वतःजवळ ठेवावीत. अधिक माहितीसाठी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावं.'
अमेरिकेने लेबनॉनमधून कर्मचारी हलवले
दरम्यान, इराणवर हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेने शेजारील देश लेबनॉनमधील आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांनाही परत बोलावून घेतलं आहे.


