Iran Israel Conflict Impact Flights : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा थेट परिणाम भारतीय विमान वाहतुकीवर झाला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी हवाई क्षेत्र बंद केल्याने रविवारी तब्बल २७९ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. 

Iran Israel conflict impact flights : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. इराण, इस्राइल आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असल्याने त्या भागातील काही हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. परिणामी भारतीय विमान कंपन्यांची रविवारी (८ मार्च) तब्बल २७९ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली. या परिस्थितीत अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि विमान कंपन्यांनी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मुंबई विमानतळावर सर्वाधिक परिणाम

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार, मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक विमानांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक परिणाम छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दिसून आला. येथे ३४ जाणारी आणि ३२ येणारी अशी एकूण ६६ उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच पश्चिम आशियातून भारतात येणाऱ्या एकूण ४९ नियोजित उड्डाणांवरही या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला.

प्रवाशांसाठी अतिरिक्त उड्डाणांची घोषणा

संकटकाळात अडकलेल्या प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी एअर इंडियाने ने १० ते १८ मार्च दरम्यान नऊ आंतरराष्ट्रीय मार्गांवर ७८ अतिरिक्त उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ९ मार्च रोजी सुमारे ५० उड्डाणे चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र परिस्थितीनुसार वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांशी संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विमान भाडेवाढ रोखण्यासाठी सरकारची पावले

केंद्र सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिली एव्हिएशन (Ministry of Civil Aviation) सध्या मध्यपूर्वेतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच विमान तिकिटांच्या किमती अचानक वाढू नयेत यासाठी विमान कंपन्यांशी सतत समन्वय साधला जात आहे. प्रवाशांची आर्थिक लूट होऊ नये आणि त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणता यावे, ही सरकारची प्राथमिकता असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

१. फ्लाइट स्टेटस तपासा: विमानतळावर जाण्यापूर्वी एअरलाईन्सच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर उड्डाणाची स्थिती तपासा.

२. हेल्पलाईनवर संपर्क: IndiGo, SpiceJet किंवा एअर इंडियाच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा.

३. रिफंडची माहिती घ्या: उड्डाण रद्द झाल्यास रिफंड किंवा पर्यायी उड्डाणाच्या नियमांची माहिती विमान कंपनीकडून घ्या.

परिस्थितीवर विमान कंपन्यांचे लक्ष

दरम्यान शनिवारी या प्रदेशातून आलेल्या ५१ उड्डाणांद्वारे सुमारे ८,१७५ प्रवाशांनी प्रवास केला होता. सध्या IndiGo, Air India Express, SpiceJet आणि Akasa Air या विमान कंपन्या Dubai, Abu Dhabi, Muscat आणि Jeddah येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.