- Home
- Utility News
- RBI Rules : स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेटचा EMI थकला? तुमचा फोन लॉक होऊ शकतो का? RBI चे नवे नियम
RBI Rules : स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेटचा EMI थकला? तुमचा फोन लॉक होऊ शकतो का? RBI चे नवे नियम
RBI ने कर्ज वसुलीसाठी नवीन नियम आणले आहेत, 1 जानेवारी 2027 पासून ते लागू होतील. यानुसार, EMI वर घेतलेले स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप काही विशिष्ट परिस्थितीतच कंपन्या लॉक करू शकतील. जर कर्ज त्याच डिव्हाइससाठी घेतलं असेल तेव्हाच हे शक्य होईल.

RBI चा नवा नियम
स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबलेट EMI वर घेणं खूप सोपं झालं आहे. पण जर तुमचा EMI चुकला तर काय होईल? कर्ज देणारी कंपनी तुमचा फोन लॉक करू शकते का? किंवा त्यातील काही फंक्शन्स बंद करू शकते का?
यावर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) स्पष्ट नियम आणले आहेत. हे नवीन नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होतील. या नियमांनुसार, कर्ज देणाऱ्या कंपन्यांना काही मर्यादित अधिकार दिले आहेत, पण त्याच वेळी ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षणही केलं आहे.
हे नियम कर्ज वसुली आणि रिकव्हरी एजंटच्या मनमानीला आळा घालण्यासाठी बनवले आहेत. यामुळे कंपन्यांना त्यांचे पैसे वसूल करता येतील, पण तेही नियमांच्या चौकटीत राहून.

EMI थकल्यास कंपनी फोन लॉक करू शकते, पण...
थोडक्यात सांगायचं तर, कोणत्याही कर्जासाठी तुमचा फोन लॉक करता येत नाही.
RBI ने स्पष्ट केलंय की, ज्या कर्जावर तुम्ही एखादं डिव्हाइस खरेदी केलं आहे, फक्त त्याच कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी ते डिव्हाइस लॉक करता येईल.
जर तुम्ही पर्सनल लोन, होम लोन किंवा कार लोनचा हप्ता चुकवला, तर कंपनी तुमचा स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप लॉक करू शकत नाही.
पण ज्या कर्जावर डिव्हाइस घेतलं आहे, त्याचा EMI चुकला तरीही कंपनी लगेच तुमचा फोन बंद करू शकत नाही. त्यासाठी कर्जाच्या करारामध्ये (loan agreement) तसा स्पष्ट उल्लेख असणं बंधनकारक आहे. तसंच, RBI च्या नियमांनुसार ग्राहकाला नोटीस आणि पुरेसा वेळ द्यावा लागेल.
म्हणजेच, कंपन्या आता ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक त्यांचा फोन बंद करू शकणार नाहीत.
कोणताही वैयक्तिक डेटा पाहू शकत नाही
डिव्हाइस लॉक करण्याची परवानगी असली तरी, RBI ने कंपन्यांना अमर्याद अधिकार दिलेले नाहीत.
फोन एकदम बंद करण्याऐवजी, त्यावर हळूहळू बंधनं आणली जातील. महत्त्वाचं म्हणजे, इनकमिंग कॉल्स आणि इमर्जन्सी SOS सारख्या अत्यावश्यक सेवा बंद करता येणार नाहीत. तसंच, कामाशी संबंधित फंक्शन्सवरही परिणाम होता कामा नये.
कारण आज स्मार्टफोन फक्त एक गॅझेट नाही, तर काम, बँकिंग, शिक्षण आणि संवादाचं एक महत्त्वाचं साधन आहे.
तुमच्या वैयक्तिक डेटाचं काय?
तुमच्या गोपनीयतेचं (Privacy) संरक्षण हा या नियमांमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
कर्ज वसुलीसाठी कंपनी तुमच्या फोनमधील कोणताही वैयक्तिक डेटा पाहू शकत नाही. यामध्ये तुमचे कॉन्टॅक्ट्स, SMS, फोटो, कॉल लॉग किंवा लोकेशन डेटा यांचा समावेश आहे.
म्हणजे, कंपनीला फक्त तिचे पैसे वसूल करण्याचा अधिकार आहे, तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा नाही.
थकबाकी भरल्यानंतर कंपनीला वेळेत फोन सुरू करावा लागेल
थकबाकी भरल्यानंतर फोन पुन्हा सुरू करण्यासाठी एक स्पष्ट वेळमर्यादा आहे.
कर्ज देणाऱ्या कंपनीच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर, एका तासाच्या आत तुमच्या डिव्हाइसवरील सर्व बंधनं काढावी लागतील. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे - तुम्ही पेमेंट केल्याच्या वेळेपासून नाही, तर कंपनीला पैसे मिळाल्यानंतर एक तासाची वेळ मोजली जाईल.
उदाहरणार्थ, तुम्ही दुपारी 2 वाजता बँकिंग ॲपद्वारे पेमेंट केलं, पण कंपनीला ते पैसे नंतर मिळाले, तर जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील, तेव्हापासून एक तासाची वेळ सुरू होईल.
जर कंपनीने चुकीने डिव्हाइस लॉक केलं किंवा पैसे मिळाल्यानंतरही ते सुरू करण्यास उशीर केला, तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते.
ही नुकसान भरपाई प्रति तास 250 रुपये आहे, आणि एकूण देय रक्कम कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त असणार नाही. कर्ज पूर्ण फेडल्यानंतर, डिव्हाइस लॉक करण्यासाठी वापरलेलं तंत्रज्ञान काढून टाकणंही बंधनकारक आहे.
कंपनीचे कर्मचारी धमकी, अपशब्द, बदनामी करू शकत नाही
RBI चे नवीन नियम फक्त स्मार्टफोनपुरते मर्यादित नाहीत. यात रिकव्हरी एजंट आणि त्यांच्या कार्यपद्धतीवरही कठोर बंधनं घालण्यात आली आहेत.
बँकांना रिकव्हरी एजंटसाठी एक आचारसंहिता (code of conduct) तयार करावी लागेल. एजंटना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) मधून आवश्यक प्रशिक्षण घ्यावं लागेल.
रिकव्हरीसाठी केलेले कॉल्स रेकॉर्ड करणं आणि ते रेकॉर्डिंग किमान सहा महिने जपून ठेवणं बंधनकारक असेल. तसंच, कॉल रेकॉर्ड होत असल्याची माहिती ग्राहकाला द्यावी लागेल. एजंट सकाळी 8 ते संध्याकाळी 7 याच वेळेत ग्राहकांशी संपर्क साधू शकतात.
त्रास देणं हा वसुलीचा मार्ग नाही
नवीन नियमांनुसार, रिकव्हरी एजंट किंवा कंपनीचे कर्मचारी धमकी किंवा अपशब्द वापरू शकत नाहीत. ते ग्राहकांची सार्वजनिक ठिकाणी बदनामी करू शकत नाहीत, किंवा त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करू शकत नाहीत. तसंच, वसुलीसाठी ग्राहकाच्या नातेवाईकांना, मित्रांना किंवा सहकाऱ्यांना त्रास देण्यासही सक्त मनाई आहे.
ग्राहकाला EMI भरावाच लागेल
EMI चुकला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सर्वात आधी तुमच्या कर्जाचा करार तपासा आणि थकबाकीची रक्कम व त्यावर लागणारं शुल्क समजून घ्या. समस्या तात्पुरती असेल, तर लगेच कंपनीशी संपर्क साधा.
EMI वर डिव्हाइस घेतलं असेल, तर करारामध्ये फोन लॉक करण्याची अट आहे का, हे नक्की तपासा.
पेमेंटच्या पावत्या, बँक स्टेटमेंट आणि कंपनीसोबतचा पत्रव्यवहार जपून ठेवा. रिकव्हरी एजंटने संपर्क साधल्यास, त्याची ओळख आणि अधिकार तपासा. एजंट त्रास देत असल्यास, कॉल आणि मेसेजचे रेकॉर्ड ठेवा.
EMI तर भरावाच लागेल
RBI चे नवीन नियम तुम्हाला संरक्षण देतात, पण कर्ज फेडण्यापासून सूट देत नाहीत. तुम्ही घेतलेले कर्ज तुम्हाला व्याज आणि शुल्कासह फेडावंच लागेल. या नियमांमुळे फक्त वसुलीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि मानवी झाली आहे. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वीच सर्व अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा.
