Makar Sankranti : जीवघेणा ठरणारा चायना मांजा कसा बनवतात? समजल्यावर बसेल धक्का!
Makar Sankranti : अतिशय उत्साहात साजरा केला जाणारा संक्रांतीचा सण एका छोट्या चुकीमुळे दुःखात बदलत आहे. पतंगांसाठी वापरला जाणारा चायना मांजा लोकांचा जीव घेत आहे. नुकत्याच संगारेड्डीमध्ये घडलेल्या एका घटनेने दुःखाचे वातावरण निर्माण केले आहे.

जीव घेणारा चायना मांजा
संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याची मजा जीवघेणी ठरत आहे. चायना मांजा वाहनचालकांच्या गळ्याभोवती अडकून त्यांचा जीव घेत आहेत. नुकतीच संगारेड्डी जिल्ह्यातील फसलवाडी येथे घडलेली घटना सर्वांनाच चटका लावून गेली. दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या गळ्याला चायना मांजा अडकल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.
क्षणात मृत्यू
फसलवाडी गावाजवळ बाईकवरून जाणाऱ्या अद्वैक नावाच्या व्यक्तीच्या गळ्याला मांजा लागला. वेगात असल्यामुळे या मांजाने त्याचा गळा कापला गेला. गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. बिहारचा रहिवासी असलेला अद्वैक फसलवाडी परिसरात एका कारखान्यात काम करत होता.
चायना मांजा म्हणजे काय? तो कसा बनवतात?
चायना मांजा हा सामान्य सुती दोरा नाही. तो बनवण्याची पद्धत खूप धोकादायक आहे. यासाठी आधी नायलॉनचा धागा घेतला जातो. त्यानंतर काचेचे तुकडे बारीक वाटले जातात. ते रासायनिक गोंदाने धाग्याला चिकटवले जातात. काहीवेळा त्यात धातूची पावडरही मिसळली जाते. या प्रक्रियेमुळे धागा एखाद्या सुरीसारखा धारदार बनतो. तो हवेत पटकन दिसत नाही आणि समोरून येणाऱ्या व्यक्तीचा गळा, हात आणि पाय कापू शकतो.
हा इतका धोकादायक का असतो?
चायना मांजा धोकादायक असण्याची कारणे स्पष्ट आहेत. तो हवेत दिसत नाही, वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना वाचण्याची संधी मिळत नाही, गळ्याला किंवा रक्तवाहिन्यांना लागल्यास क्षणात जीव जाऊ शकतो. मोठ्या संख्येने पक्षी मरतात. लहान मुले आणि वृद्ध गंभीर जखमी होतात.
बंदी असूनही सर्रास वापर
चायना मांजाच्या वापरावर बंदी आहे. पोलीस दुकानांवर छापे टाकत आहेत. गुन्हे दाखल करत आहेत. तरीही काही लोक निष्काळजीपणे तो वापरतच आहेत. सणाच्या आनंदासाठी जीवाशी खेळणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न काहीजण विचारत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना चायना मांजा वापरण्यापासून रोखावे, असे सुचवले जात आहे. तसेच, वाहनांवरून प्रवास करणाऱ्यांनीही काळजी घ्यावी, असे तज्ज्ञ सांगतात.

