नवे लायसन्स नियम लागू असूनही भारतात चांदीची आयात पुन्हा वाढली आहे. देशांतर्गत बाजारात चांदीचे दर वाढल्याने व्यापाऱ्यांनी आयातीला सुरुवात केली आहे. मात्र, कागदपत्रांच्या अडचणींमुळे पुरवठ्यात अडथळे येत आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर नवे लायसन्स नियम आणि कायदेशीर बंधनं घातली आहेत. पण तरीही भारतात चांदीची आयात पुन्हा एकदा वाढू लागली आहे. यामागे कारण आहे देशांतर्गत बाजारात चांदीला मिळणारा चढा भाव आणि आकर्षक प्रीमियम. याच संधीचा फायदा घेण्यासाठी व्यापारी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. अनेक अडचणी दूर करत बँका आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी चांदी आयात करण्यासाठी परवाने मिळवण्यास सुरुवात केली आहे.

६ महिन्यांनंतर मोठी आयात

गेल्या सहा महिन्यांपासून चांदीची आयात जवळपास पूर्णपणे थांबली होती. पण आता नियम थोडे शिथिल झाल्यावर, एकट्या ऑगस्ट महिन्यातच ८९.८१ टन चांदी भारतात दाखल झाली आहे. ही सर्व चांदी गुजरातमधील इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT City) येथील इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून भारतात आणण्यात आल्याची माहिती ब्लूमबर्गने दिली आहे.

भारत हा जगात चांदीचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांपैकी एक आहे. आपल्या गरजेसाठी भारत पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. सध्या देशात चांदीचे दर वाढलेले असल्यामुळे व्यापाऱ्यांना परदेशातून चांदी आयात करणं फायदेशीर ठरत आहे.

४०० टनाच्या लायसन्सला मंजुरी

मेटल्स फोकस लिमिटेड या संस्थेच्या मते, जुलैच्या तुलनेत आता बाजारात चांदीची उपलब्धता सुधारली आहे. सरकारने सुमारे ४०० टन चांदी आयात करण्याच्या परवान्यांना मंजुरी दिल्याचं मानलं जात आहे. चांदीचा पुरवठा वाढल्यामुळे स्थानिक बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांमधील तफावत कमी झाली आहे. परकीय चलन साठा वाचवण्यासाठी गेल्या मे महिन्यात केंद्र सरकारने चांदीच्या आयातीसाठी लायसन्स अनिवार्य केलं होतं. या निर्णयानंतर आयातीत मोठी घट झाली होती.

सध्या व्यापाऱ्यांना परवाने मिळाले असले तरी, आवश्यक कागदपत्रं वेळेवर सादर करता येत नसल्याने आयातीचा वेग मंदावला आहे. नव्या नियमांनुसार, चांदी कोणत्या देशात तयार झाली आहे, याचा अधिकृत दाखला (Certificate of Origin) प्रत्येक शिपमेंटसोबत सादर करणं बंधनकारक आहे. ही कागदपत्रं वेळेत मिळत नसल्याने अनेक ठिकाणी चांदी कस्टममध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे जे देश ही कागदपत्रे लवकर देतात, त्यांच्याकडून चांदी खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल वाढला आहे.

सणासुदीच्या काळात मागणी वाढणार

येणारा सणासुदीचा आणि लग्नसराईचा काळ लक्षात घेता, सराफ व्यावसायिक चांदीचा साठा वाढवण्याची शक्यता आहे. मात्र, परवाना मिळाल्यानंतरही शिपिंग, कस्टम क्लिअरन्स आणि रिफायनिंग या प्रक्रियेला अनेक आठवडे लागतात. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात चांदी येण्याऐवजी, सध्या उपलब्ध असलेला साठा आणि छोट्या प्रमाणातील पुरवठ्यावरच बाजाराची भिस्त आहे.