INDW vs SAW Final: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे विजेतेपद भारतीय महिला संघाने पटकावले आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिले विश्वविजेतेपद जिंकले आहे. या सामन्यात ५ मोठ्या स्टार खेळाडू उदयास आल्या आहेत. 

IND W vs SA W, Women's World Cup Final 2025: भारतीय महिला संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले आहे. नाणेफेक गमावण्याव्यतिरिक्त, टीम इंडियाने या अंतिम सामन्यात दुसरी कोणतीही चूक केली नाही. प्रथम फलंदाजी करताना बोर्डवर २९८ धावा केल्या. शेफाली वर्माने अप्रतिम खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीतही धमाल करत आफ्रिकेच्या फलंदाजीला गुंडाळले आणि इतिहास रचला. चला या विजेतेपदाच्या ५ स्टार खेळाडूंवर नजर टाकूया.

शेफाली वर्मा

प्रतिका रावलच्या दुखापतीनंतर भारतीय संघात सामील झालेल्या शेफाली वर्माने अंतिम सामन्यात धमाल केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिला संधी मिळाली, पण ती फक्त १० धावा करून बाद झाली होती. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिने संधीचे सोने केले. तिने ७८ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. याशिवाय तिने गोलंदाजीतही कमाल केली. गोलंदाजीत २ बळी घेतले. कठीण परिस्थितीत तिने भारताला यश मिळवून दिले.

स्मृती मानधना

स्मृती मानधनानेही अंतिम सामन्यात अप्रतिम खेळी केली. शेफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. तिच्या बॅटमधून ५८ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ४५ धावा निघाल्या. तिच्या या खेळीमुळे भारतीय संघाला मजबूत सुरुवात मिळाली आणि संघ २९८ धावांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला. याशिवाय, ती या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये दुसरी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिच्या बॅटमधून एक शतकही आले.

दीप्ती शर्मा

दीप्ती शर्मा या सामन्यात पुन्हा एकदा भारतासाठी मोठी गेम चेंजर ठरली. प्रथम फलंदाजीत भारतीय संघासाठी ५८ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५८ धावा केल्या. त्यानंतर जेव्हा गोलंदाजीची वेळ आली, तेव्हा तिने कमाल केली. तिने ९ षटकांत ३९ धावा देत ४ फलंदाजांना आपले शिकार बनवले. तिच्या या दमदार स्पेलमुळे भारत सामन्यात परत आला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वर्टचा बळी घेतला, जी १०१ धावांवर खेळत होती.

श्री चरनी

श्री चरनीच्या दमदार फिरकी गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेची कंबर मोडली. तिने ८ षटकांत फक्त ३४ धावा दिल्या आणि १ फलंदाजाला बाद केले. तिने मधल्या षटकांमध्ये चेंडूने अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. तिच्या या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला खूप मागे टाकले. तिने फॉर्मात असलेल्या फलंदाज लॉरा वॉल्वर्टलाही खेळण्याची संधी दिली नाही. तिच्या स्पेलमध्ये एकही खराब चेंडू पाहायला मिळाला नाही.

अमनजोत कौर

अमनजोत कौरने बॅटने १४ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने १२ धावा केल्या. त्याशिवाय गोलंदाजीतही ४ षटकांत ३४ धावा दिल्या. पण, या सर्व गोष्टी सोडून तिने या विजयात सर्वात मोठे योगदान आपल्या क्षेत्ररक्षणाने दिले. पहिल्या विकेटसाठी दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली होती. लॉरा वॉल्वर्ट आणि ताजमीन बिट्स यांच्यात ५१ धावांची भागीदारी झाली होती. पण, याच दरम्यान अमनजोत कौरच्या एका शानदार थ्रोने बिट्सला धावबाद करून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर भारत सामन्यात परत आला.