T20 World Cup 2026 : भारताने पाकिस्तानला धूळ चारली, दणदणीत विजय नोंदवला!
India Beats Pakistan In T20 World Cup 2026 Ishan Kishan Shines : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

पाकिस्तानवर भारताचा मोठा विजय, कोलंबोमध्ये फडकला तिरंगा
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मधील एका रोमांचक सामन्यात टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. ईशान किशनच्या (77) धडाकेबाज फलंदाजीमुळे आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने पाकिस्तानला धूळ चारली. हाय-व्होल्टेज दबावातही, सूर्यकुमारच्या संघाने अचूक रणनीतीने खेळून पाकिस्तानवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर भारताने 20 षटकांत 175 धावा केल्या. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारताचा सलामीवीर ईशान किशनने आपल्या स्फोटक खेळीने सर्वांना प्रभावित केले. तथापि, मधल्या षटकांमध्ये पाकच्या फिरकीपटूंनी पुनरागमन केल्यामुळे भारताला 200 धावांचा टप्पा गाठता आला नाही.
अभिषेक शर्मा अपयशी, ईशान किशनचे झंझावाती अर्धशतक
भारताच्या डावाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सलामीवीर अभिषेक शर्मा (0) पुन्हा एकदा अपयशी ठरला. डावाच्या पहिल्याच षटकात सलमान आघाच्या गोलंदाजीवर शाहीन आफ्रिदीकडे झेल देऊन तो शून्यावर बाद झाला. मात्र, दुसऱ्या बाजूने ईशान किशनने पाक गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. शाहीन आफ्रिदीच्या दुसऱ्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून त्याने वेग वाढवला. पॉवरप्ले संपेपर्यंत भारताने एका विकेटच्या मोबदल्यात 52 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे यात किशनच्या एकट्याच्या 42 धावा होत्या. किशनने केवळ 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिलक वर्माने (25) सावध खेळ करत किशनला साथ दिली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली.
पाक फिरकीपटूंची जादू, शेवटी रिंकू सिंगचा फिनिशिंग टच
भारत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना, सईम अय्युबने पाकिस्तानला सामन्यात परत आणले. धोकादायक ठरत असलेल्या ईशान किशनला (77 धावा, 40 चेंडू, 10 चौकार, 3 षटकार) त्रिफळाचीत करून त्याने भारताला धक्का दिला. त्यानंतर 15व्या षटकात सईम अय्युबने सलग चेंडूंवर तिलक वर्मा (25) आणि हार्दिक पांड्या (0) यांना बाद करून हॅट्ट्रिकची संधी निर्माण केली.
कर्णधार सूर्यकुमार यादवने (32) शेवटपर्यंत क्रीजवर राहण्याचा प्रयत्न केला, पण तो उस्मान तारिकच्या गोलंदाजीवर बाद झाला. शेवटच्या षटकांमध्ये शिवम दुबे (27) आणि रिंकू सिंग (11*) यांनी फटकेबाजी केली. विशेषतः रिंकूने शेवटच्या षटकात एक मोठा षटकार ठोकला, तर अक्षर पटेल शेवटच्या चेंडूवर बाद झाला. पाक गोलंदाजांमध्ये सईम अय्युबने 3 बळी घेतले, तर उस्मान तारिकने किफायतशीर गोलंदाजी करत एक महत्त्वाचा बळी घेतला.
भारतीय गोलंदाजांनी पाक फलंदाजांना लोळवले
176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला सुरुवातीलाच धक्के दिले. डावाच्या पहिल्याच षटकात हार्दिक पांड्याने आपल्या भेदक गोलंदाजीने साहिबजादा फरहानला (0) रिंकू सिंगकरवी झेलबाद केले. त्यानंतर दुसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहने आपल्या खास शैलीत धोकादायक सईम अय्युबला (6) पायचीत करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला.
कर्णधार सलमान अली आघा (4) सुद्धा बुमराहच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याकडे झेल देऊन परतला. स्टार फलंदाज बाबर आझमला (5) अक्षर पटेलने त्रिफळाचीत केल्याने पाकिस्तानचा डाव कोसळला. उस्मान खानने (44) काही काळ प्रतिकार केला, पण अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर ईशान किशनने केलेल्या शानदार स्टंपिंगमुळे तो तंबूत परतला. भारतीय गोलंदाजांच्या अचूक टप्प्यासमोर पाक फलंदाजांनी नांगी टाकली. बुमराह, अक्षर, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
अखेरीस पाकिस्तानचा संघ 18 षटकांत 114 धावांवर सर्वबाद झाला. यामुळे भारताने 61 धावांनी विजय मिळवला. गट 'अ' मध्ये भारत 6 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. तसेच, भारताने सुपर 8 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

