RCB vs CSK: चेन्नई सुपर किंग्ससमोर २५१ रन्सचं मोठं आव्हान आहे. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली आहे. एवढ्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग चेन्नई करू शकेल का? जाणून घ्या प्रत्येक अपडेट.

RCB vs CSK: आयपीएलच्या रणांगणात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांनी धुव्वा उडवला. आरसीबीच्या ऐतिहासिक 250 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव अवघ्या 207 धावांत आटोपला. या पराभवासोबतच चेन्नईने पराभवाची 'हॅट्ट्रिक' पूर्ण केली असून, यंदाच्या हंगामातील त्यांचा प्रवास आता खडतर झाला आहे. नेमकी कुठे चुकली 'यलो आर्मी'? जाणून घेऊयात पराभवाची पाच प्रमुख कारणं.

1. गोलंदाजीची सपशेल शरणागती

चेन्नईची गोलंदाजी यंदाच्या मोसमात सर्वात कमकुवत दुवा ठरली आहे. राजस्थानविरुद्ध साधे 128 धावांचे रक्षण न करू शकलेले गोलंदाज, आरसीबीविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत पूर्णपणे निष्प्रभ ठरले. आजच्या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी तब्बल 250 धावा कुटल्या, यावरूनच चेन्नईच्या गोलंदाजीची धार किती बोथट झाली आहे हे स्पष्ट होते.

2. फलंदाजीतील सातत्याचा अभाव

पहिल्या सामन्यात फलंदाजी कोसळल्यानंतर दुसऱ्या सामन्यात 200 धावांचा टप्पा ओलांडला, तरीही विजय मिळाला नाही. आजच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुन्हा एकदा फलंदाजी 'फ्लॉप' ठरली. ठराविक अंतराने विकेट्स गमावल्यामुळे चेन्नईला कधीही सामन्यावर पकड मिळवता आली नाही.

3. संजू सॅमसनची खराब फॉर्म

ट्रेड विंडोद्वारे संघात सामील झालेला स्टार खेळाडू संजू सॅमसन कडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, टी-20 वर्ल्ड कप गाजवलेला संजू आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे. राजस्थानविरुद्ध 6, पंजाबविरुद्ध 7 आणि आज आरसीबीविरुद्ध केवळ 9 धावांवर तो बाद झाला. मधल्या फळीतील त्याचे अपयश चेन्नईला महाग पडत आहे.

4. ऋतुराजच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड अद्याप आपली छाप पाडू शकलेला नाही. मैदानात योग्य रणनीतीचा अभाव आणि स्वतः फलंदाजीतही अपयशी ठरत असल्यामुळे त्याच्यावर दडपण वाढत आहे. निर्णायक क्षणी योग्य बदल करण्यात तो कमी पडताना दिसत आहे.

5. लिलावातील चुका आणि संघ बांधणी

चेन्नईने लिलावात 'झेन्जी' (Gen-Z) खेळाडूंवर भर दिला खरा, पण संघात योग्य ताळमेळ बसताना दिसत नाहीये. अनुभवाची कमतरता आणि खेळाडूंच्या भूमिकेबाबत स्पष्टता नसल्यामुळे मैदानात सांघिक कामगिरी होताना दिसत नाही.

प्ले-ऑफचे गणित काय?

सलग तीन पराभवांनंतर चेन्नईसाठी आता 'करो या मरो'ची स्थिती आहे. उर्वरित 11 पैकी किमान 8 सामने जिंकणे आता अनिवार्य आहे. खराब नेट रनरेटमुळे 7 विजय कदाचित पुरेसे ठरणार नाहीत, त्यामुळे प्रत्येक सामना आता फायनलसारखा खेळावा लागणार आहे.