Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 29 मार्चपासून देशातील तब्बल 46 शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांसाठी मोठी खुशखबर घेऊन आले आहे. आतापर्यंत मर्यादित शहरांपुरती असलेली विमानसेवा आता मोठ्या प्रमाणावर विस्तारली जाणार आहे. 29 मार्चपासून देशातील तब्बल 46 शहरांना नवी मुंबई विमानतळाशी जोडण्यात येणार असून, यामुळे हवाई प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
29 मार्चपासून नवे वेळापत्रक लागू
नवी मुंबई विमानतळावरून याआधी केवळ 16 शहरांसाठी दिवसभरात विमानसेवा उपलब्ध होती. मात्र, 29 मार्चपासून ही संख्या वाढून 46 शहरांपर्यंत पोहोचणार आहे. 29 मार्च ते 24 ऑक्टोबर या कालावधीसाठी उन्हाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, या कालावधीत प्रवाशांना अधिक पर्याय मिळणार आहेत.
प्रमुख शहरांसाठी वाढीव उड्डाणे
नव्या वेळापत्रकानुसार, दिल्लीसाठी दररोज 9 उड्डाणे असतील, तर गोवासाठी 7 आणि बेंगळुरूसाठी 6 उड्डाणे सुरू राहतील. याशिवाय कोचीसाठी 5 उड्डाणे असतील. तसेच हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूर या शहरांसाठी दररोज नियमित विमानसेवा उपलब्ध असणार आहे.
देशभरातील अनेक शहरांना जोडणी
या नव्या योजनेत आग्रा, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दिऊ, दुर्गापूर, डाबोळीम (गोवा), गोरखपूर, हिंडन, राजकोट, हुबळी, जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, तिरुवनंतपुरम आणि विशाखापट्टणम यांसारख्या शहरांचा समावेश आहे. यामुळे देशातील विविध भागांशी कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल.
प्रवाशांसाठी मोठा दिलासा
या विस्तारित सेवेमुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना प्रवासासाठी अधिक पर्याय मिळणार आहेत. तसेच गर्दी कमी होऊन प्रवास अधिक आरामदायी होईल. देशांतर्गत पर्यटन आणि व्यवसायासाठीही याचा मोठा फायदा होणार आहे.


