- Home
- Mumbai
- Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आता उन्हाळ्यात प्रवास होणार 'गारेगार'; पश्चिम रेल्वेवर धावणार जादा AC लोकल
Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आता उन्हाळ्यात प्रवास होणार 'गारेगार'; पश्चिम रेल्वेवर धावणार जादा AC लोकल
Mumbai AC Local Train Services: पश्चिम रेल्वेने १९ फेब्रुवारीपासून मुंबईत नवीन एसी लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे ११ साध्या लोकल फेऱ्या एसीमध्ये रूपांतरित होणार असून, एकूण एसी फेऱ्यांची संख्या १३३ वर पोहोचेल.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आता उन्हाळ्यात प्रवास होणार 'गारेगार'
मुंबई : मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने १९ फेब्रुवारी (शिवजयंती) पासून आपल्या ताफ्यात नवीन लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विशेषतः एसी (AC) लोकलच्या फेऱ्यांवर भर देण्यात आला आहे.
काय आहेत नवीन बदल?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण ४ नवीन फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. यात १ नवीन एसी लोकल आणि ३ साध्या लोकलचा समावेश आहे. मात्र, महत्त्वाचा बदल असा की, तब्बल ११ साध्या लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी एसी लोकल चालवल्या जाणार आहेत.
फेऱ्यांचा नवा आकडा
एसी लोकल: सध्याच्या १२१ फेऱ्यांवरून आता ही संख्या १३३ वर पोहोचणार आहे. (१२ अतिरिक्त फेऱ्यांची वाढ)
एकूण लोकल फेऱ्या: पश्चिम रेल्वेवरील एकूण फेऱ्या आता १४१० वरून १४१४ होणार आहेत.
विकेंड स्पेशल: शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी गूड न्यूज! विकेंडला धावणाऱ्या एसी सेवा आता ७७ वरून थेट १०६ करण्यात आल्या आहेत.
विरारकरांना मोठा दिलासा
कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दृष्टीने रेल्वेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या भाईंदर ते वांद्रे दरम्यान धावणारी धीमी (Slow) लोकल आता थेट विरारपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा आधार मिळणार आहे.
रेल्वेच्या या 'कुल' निर्णयामुळे दिलासा मिळणार
वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना रेल्वेच्या या 'कुल' निर्णयामुळे नक्कीच दिलासा मिळेल. त्यामुळे आता १९ तारखेपासून तुमचा लोकल प्रवास अधिक हायटेक आणि थंडगार होणार आहे.

