सध्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशा वेळी काही समाजविघातक शक्ती त्यांना टार्गेट करु शकतात. पण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अशा वेळी काय होणार..

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला नवा वळण मिळत आहे. "मला गोळ्या घालून ठार मारायचे की आरक्षण द्यायचे, हे सरकारच्या हाती आहे," असा थेट इशारा त्यांनी पहिल्याच भाषणात दिला होता. रविवारी त्यांच्या उपोषणस्थळाची रेकी करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण अधिक तापले आहे. या व्यक्तीकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आंदोलनस्थळी काही पोलिस भगव्या रंगाचे दुपट्टे घेऊन असल्याचा गंभीर आरोप खुद्द जरांगे यांनीच केला आहे. यामुळे आंदोलनाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशा वेळी समाजविघातक शक्ती त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईसारख्या संवेदनशील शहरात आंदोलनादरम्यान कोणताही गदारोळ झाल्यास शांततेला तडा जाऊ शकतो. त्यामुळे सरकार आणि प्रशासन पूर्ण सतर्क आहे. जरांगे यांच्या जिवाला काही अनिष्ट झाले, तर थेट सरकारवर बोट ठेवले जाईल. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत सरकार कोणतीही ढिलाई ठेवणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

सध्याच्या घडीला जरांगेंच्या जिवाला तातडीचा धोका नसल्याचे स्पष्ट होत असले तरी परिस्थिती गंभीर आहे. पुढील काही दिवसांतील घडामोडींवर मराठा आंदोलनाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.