मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'डिजिटल अरेस्ट' या सायबर जनजागृती फिल्मचं लाँचिंग केलं. सायबर चोरांना बळी पडू नका आणि फसवणूक झाल्यास तात्काळ '1930' या हेल्पलाइनवर संपर्क साधा, असं आवाहन त्यांनी केलं. फसवणुकीनंतरचा 'गोल्डन अवर' पैसे परत मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही ते म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सायबर गुन्हेगारांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ '1930' या सायबर हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा, असं ते म्हणाले. "पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने भीती दाखवून सायबर गुन्हेगार नागरिकांना लुटतात. नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी पडू नये आणि फसवणूक झाल्यास लगेच '1930' या सायबर हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा," असं आवाहन त्यांनी केलं.

बुधवारी मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊसवर महाराष्ट्र सायबरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी 'डिजिटल अरेस्ट' या सायबर-जागरूकता शॉर्ट फिल्मचं आणि '1930 महाराष्ट्र सायबर अँथम'चं लाँचिंग करण्यात आलं. या शॉर्ट फिल्म आणि सायबर अँथमसाठी आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी, गायिका सुनिधी चौहान, मंगेश देसाई आणि समय रैना या कलाकारांनी योगदान दिलं आहे, असं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

फसवणुकीनंतरचा 'गोल्डन अवर' सर्वात महत्त्वाचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर फसवणूक झाल्यानंतरचा सुरुवातीचा 'गोल्डन अवर' (golden hour) अत्यंत महत्त्वाचा असतो. या वेळेत तक्रार दाखल केल्यास फसवणूक झालेली रक्कम गोठवण्याची किंवा परत मिळवण्याची शक्यता खूप वाढते. मात्र, नागरिक जेव्हा तीन ते पंधरा दिवसांनी उशिरा तक्रार करतात, तेव्हा पैसे अनेक खात्यांमध्ये फिरवले जातात, ज्यामुळे ते परत मिळवणं खूप कठीण होतं. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, अजिबात वेळ न घालवता '1930' वर संपर्क साधावा, असंही त्यांनी सांगितलं.

वाढत्या धोक्यांमुळे जनजागृती आवश्यक

आजच्या काळात मोबाईल आणि ऑनलाईन व्यवहार, विविध पेमेंट गेटवे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. तंत्रज्ञानामुळे आयुष्य सोपं झालं असलं तरी, सायबर गुन्हेगारीचा धोकाही वाढला आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं.

ते म्हणाले की, सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासोबतच, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणंही गरजेचं आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या वापरतात - जसं की पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचं सांगणं, ओटीपी फ्रॉड, बनावट फोन कॉल्स आणि पोलीस किंवा सीबीआयच्या नावाने धमक्या देणं. स्क्रीनवर खाकी वर्दीतील व्यक्ती, किंवा पोलीस अधिकारी किंवा न्यायाधीश म्हणून कोणी दिसल्यास सामान्य नागरिक घाबरतात आणि फसवणुकीला बळी पडतात. नागरिकांनी अशा कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृती हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे आणि हा संदेश कलाकार, अभिनेते आणि गायकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवता येतो, असं फडणवीस म्हणाले. 'डिजिटल अरेस्ट' या ४२ मिनिटांच्या जनजागृती फिल्मसोबतच विविध क्लिप्स आणि रील्सचा वापर करून व्यापक सोशल मीडिया मोहिमेद्वारे हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

AI मुळे निर्माण झालेली नवी आव्हानं

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक आणि बनावट ऑडिओ-व्हिडिओच्या रूपात नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सायबर करत असलेलं काम कौतुकास्पद आहे, असं ते म्हणाले. सर्वांच्या सहकार्याने भविष्यात एक व्यापक सायबर-जागरूकता मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमातील महत्त्वाचे क्षण आणि भावी योजना

या कार्यक्रमात, महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांनी आगामी 'महाराष्ट्र सायबर सेफ ॲप' आणि 'आशा कॉल बॉट' या प्रकल्पांबद्दल सादरीकरण केलं.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'डिजिटल अरेस्ट' सायबर-जागरूकता शॉर्ट फिल्म आणि '1930 महाराष्ट्र सायबर अँथम'साठी योगदान देणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कलाकारांनीही आपले विचार मांडले.

या कार्यक्रमाला राज्यमंत्री पंकज भोयर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ ढवसे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (सायबर) संजय शिंत्रे आणि महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव उपस्थित होते.