Iskcon Surdasji on Ajit Pawar : खारघर इस्कॉनचे अध्यक्ष सूरदासजी यांनी अजित पवारांना श्रीमद् भागवत ग्रंथ दिला असल्याचं सांगितलं. हा ग्रंथ वाचल्याने अपघाती मृत्यू होत नाही, असा दावा करत त्यांनी अजितदादांनाही तो वाचायला सांगितला होता, असं म्हटलंय.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झालं. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आता खारघर इस्कॉनचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी भाष्य केलं आहे. श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. अजित दादांनी हा वाचला नसावा, असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या निधनाला अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले डॉ. सूरदासजी?
खारघर इस्कॉनचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी सांगितलं, की 'श्रीमद् भागवत ग्रंथ वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही. मी अजित पवार यांनाही हा ग्रंथ भेट दिला होता. पण त्यांनी कदाचित तो ग्रंथ वाचला नसावा. आषाढी एकादशीच्या दिवशी मी हा ग्रंथ त्यांना दिला होता. त्यांनी हा ग्रंथ आवश्य वाचावा, असंही सांगितलं होतं. पण त्यांनी मी भेट दिलेला श्रीमद् भागवत ग्रंथ वाचला नसावा. त्यांच्यासोबत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.' दरम्यान, सूरदासजी यांच्या या नव्या विधानाची एकच चर्चा सुरू झाली आहे.
विमान अपघातात अजित दादांचा दुर्दैवी मृत्यू
बारामती येथील विमानतळावर अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मुंबईहून ते बारामतीला निघाले होते. निवडणुकीचा काळ असल्याने प्रचारासाठी ते निघाले होते. २८ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर ते जवळपास पोहोचले होते. पण विमान लँड होताना पायलटचं नियंत्रण सुटलं आणि विमान कोसळलं. या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला.
खराब हवामानामुळे तसंच दाटं धुकं असल्याने विमान लँड होताना ते कोसळलं आणि विमान कोसळल्याबरोबर तात्काळ त्याला भीषण आग लागली. या आगीत अजितदादांसोबत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. कॅप्टन सुमित कपूर (पायलट), कॅप्टन शांभवी पाठक (को-पायलट), एअर होस्टेस आणि अजित दादांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक (PSO) अशा पाच जणांचा मृत्यू झाला.
