देशभरातील विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. गुप्तचर खात्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची आणि इतरांची कडक तपासणी करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : भारतभरातील सर्व विमानतळांना दहशतवादी हल्ल्याचा संभाव्य धोका असल्याचा इशारा मिळाल्यानंतर नागरिक विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) ने सर्व संबंधित यंत्रणांना सुरक्षा अधिक वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशातील विमानतळ, हवाई पट्टी, हेलिपॅड्स, फ्लायिंग स्कूल्स आणि प्रशिक्षण संस्थांवर दहशतवादी किंवा समाजविघातक तत्वांकडून हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सर्व विमानतळांना सतर्कतेचे आदेश
BCAS ने ४ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अलर्ट मेसेजमध्ये, तत्काळ सर्व सुरक्षा उपाय यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये टर्मिनल परिसर, पार्किंग क्षेत्र, परिघ आणि इतर संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवण्याचा आदेश दिला गेला आहे. शहराकडील बाजूसही स्थानिक पोलीस दलाच्या समन्वयाने सुरक्षा वाढवण्याचे निर्देश आहेत.
पाकिस्तानी दहशतवादी गटाशी संबंधित गुप्त माहितीवरून इशारा
PTI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, हा अलर्ट पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या हालचालींविषयी मिळालेल्या विशिष्ट माहितीवर आधारित आहे. त्यामुळे देशभरातल्या सर्व हवाई वाहतूक यंत्रणांना स्थानीय पोलीस, CISF, IB आणि इतर यंत्रणांशी सतत संपर्कात राहण्यास सांगितले आहे. कोणतीही गुप्त माहिती मिळाल्यास ती तातडीने सर्व संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याचा आदेश आहे.
कर्मचाऱ्यांपासून ते पाहुण्यांपर्यंत कडक ओळख तपासणी
सर्व विमानतळांवरील कर्मचारी, ठेकेदार आणि पाहुण्यांची ओळखपत्रांची काटेकोर तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. CCTV प्रणाली सतत कार्यरत आणि लक्षपूर्वक निरीक्षणाखाली ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही याच सुरक्षा उपायांमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. सर्व सामान, मेल आणि पार्सल यांची चोख तपासणी प्रत्येक विमानतळावर बंधनकारक करण्यात आली आहे.
संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्र सतर्क ही सूचना राज्य पोलीस विभाग, विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपन्यांना पाठवण्यात आली असून, देशभरातील सर्व नागरी विमान सेवा संस्थांनी सुरक्षा उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश मिळवले आहेत.
दहशतवादी हल्ल्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनीही सतर्क राहावे, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ सुरक्षा यंत्रणांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


