BMC Election Results 2026 : मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गटाच्या विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
BMC Election Results 2026 : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्षाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेषतः प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने तब्बल २५ वर्षांची ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राज्यात भाजपाचं वर्चस्व, मुंबईत सत्तांतर
राज्यातील २९ महापालिकांपैकी बहुतांश महापालिकांमध्ये भाजपाच्या विजयाचं कमळ फुललेलं दिसत आहे. सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेतही भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असून, भाजप-शिवसेना युतीचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे मुंबई महापालिकेवरील ठाकरे गटाची २५ वर्षांची सत्ता संपली आहे.
“सत्ता आणि पैसा आमच्याकडे असता तर…” – राऊतांचा घणाघात
मुंबई ठाकरे गटाकडे का टिकली नाही, या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊतांनी आक्रमक भूमिका घेतली. “आमच्या हातात सत्ता आणि एवढा पैसा असता, तर भाजप देशही टिकवू शकला नसता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले नसते आणि एकनाथ शिंदे यांचं पदही टिकून राहिलं नसतं,” अशा शब्दांत राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली.
“भाजपच्या १०० पिढ्या उतरल्या तरी मुंबई जिंकता आली नसती”
राऊत पुढे म्हणाले की, “शिवसेनेचे ६० नगरसेवक फोडले गेले, त्यापैकी ९० टक्के उमेदवार पराभूत झाले. तरीही शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मिळून ७१ जागा मिळाल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या पाठीशी उभा राहिला.” एकनाथ शिंदेंवर टीका करताना राऊत म्हणाले, “शिंदे जयचंद झाला नसता, तर भाजपच्या १०० पिढ्या उतरूनही मुंबईवर त्यांचा झेंडा फडकला नसता.”
फडणवीस भांडण लावत असल्याचा आरोप
निकालानंतर राज ठाकरे यांचे ट्विट, निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे ‘सर्वात मोठे लूजर ठरतील’ असे केलेले वक्तव्य, तसेच मनसेच्या पराभवावरून उपस्थित प्रश्नांवरही राऊतांनी भाष्य केलं. “हा पराभव आम्ही मानत नाही. आम्ही चांगली लढत दिली आहे. मनसेला आणखी १०-१२ जागा मिळू शकल्या असत्या. काही उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले. मनसेच्या उमेदवारांसाठी शिवसैनिकांनी पूर्ण ताकद लावली,” असं राऊत म्हणाले.
मनसेसोबत पुढील चर्चा होणार
मनसेच्या कमी जागांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “यावर आम्ही एकत्र बसून चर्चा करू. ही लढाई मराठी अस्मितेची होती आणि ती पुढेही सुरू राहील.


