पुण्यातील बड्या व्यावसायिकाच्या मुलाला केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून त्याच्याच होणाऱ्या बायकोने संपवलं. पुणे पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला आणि धक्कादायक बाबी समोर आल्या. केतनच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या हत्येनंतर प्रतिक्रिया उद्गिग्न प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : बिल्डर हा सर्वसामान्य घर घेणाऱ्यांसाठी दगडाच्या काळजाचा माणूस, पण अखेर बाप बापच असतो, २४ वर्षांचा मुलगा त्यांनी काही सेकंदात संपवला, कोट्यवधी रुपये असताना बाप म्हणतोय ही नैतिकता आहे का? हे संस्कार आहेत का, आणि सांगितलं असतं ना एका वाक्यात …. बिल्डर बापाचे शब्द ऐकून आपणही स्तब्ध होतो, पण इलाज कुणाचाच चालत नाही. पुण्यातील केतनच्या हत्येनंतर अख्ख्या महाराष्ट्र हादरला आहे.

पुण्यातील व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून त्याच्या होणाऱ्या बायकोनेच सिया गोयल हिने आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी ठार मारलं. चौकशीत सियाला केतनसोबत लग्न करायचं नसल्याचं समोर आलं आहे. जर लग्न करायचं नव्हतं तर तिने सरळ नकार द्यायचा होता, आमच्या मुलाला का ठार मारलं असा उद्गिग्न सवाल केतनच्या आई-वडिलांनी केला आहे.
याबाबत बोलताना मृत केतनचे वडील म्हणाले, 'सिया आणि केतन यांचा फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता. ६ तारखेला ते बालीला जाणार होते. चौघे जण एकत्र बालीसाठी जाणार होते, पण त्याचवेळी केतनचा पासपोर्ट चोरीला गेला, त्यामुळे तो त्यांच्यासोबत बोलीला जाऊ शकला नाही. तो विमानतळावरुन परत घरी आला होता. जर सियाला लग्न करायचं नव्हतं, तर तिने नकार द्यायला हवा होता आम्ही तात्काळ लग्न रद्द केलं असतं, पण तिने आमच्या मुलाची हत्या करत इतकं टोकाचं पाऊल का उचललं? यामागची मानसिकता काय आहे? हे कुठून आलं तिच्या कुटुंबातून की संस्कारातून?' असा सवाल करत विशाल अग्रवाल यांनी केला आहे.
सिया आणि केतनचं लग्न ठरलं त्यावेळी नेमकं काय झालेलं याची आठवण सांगताना विशाल अग्रवाल म्हणाले, की सिया केवळ २० वर्षांची होती. त्यामुळे तुमची मुलगी अजून खूप लहान आहे असं सांगत सियाच्या कुटुंबातून आलेला लग्नाचा प्रस्ताव अग्रवाल कुटुंबाने नाकारला होता. पण दोन्ही कुटुंबांची ४० वर्षांपासूनची ओळख होती. सियाच्या कुटुंबातून सतत लग्नासाठी विनंती होत असल्याने अखेर लग्नासाठी होकार दिला. पुढे दोन्ही कुटुंब एकमेकांकडे येत-जात होते, पण सियाच्या मनात असं काही असेल याची कल्पनाही केली नव्हती.
केतनच्या वडिलांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत. सुरुवातीला केवळ अपघात, दुर्घटना वाटत असलेल्या घटनेचा पुणे पोलिसांनी छडा लावत संपूर्ण प्रकरण उलगडत हा अपघात नसून हत्या असल्याचं सांगितलं आणि खरं काय ते केतनच्या कुटुंबाला समजलं. आमच्या मुलाला संपवणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही केतनच्या आई-वडिलांनी केली आहे. या प्रकरणी सिया आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

