NCP Merger : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. 

NCP Merger : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या (NCP Merger) चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नामुळे आणि भावनिक वातावरणामुळे विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

विलीनीकरणाबाबत जयंत पाटील यांचे सूचक विधान

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी बारामती येथे सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती दिली. “आम्ही चार-पाच जण सुनेत्रा पवारांना भेटलो. कोणतीही मदत लागली तर निःसंकोच सांगा. मनात किंतू ठेवू नका,” असे ते म्हणाले. तसेच, विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरू असताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबतही एक-दोन वेळा चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. “त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी सहकार्याची भूमिका अधोरेखित केली.

दरम्यान, अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी विलीनीकरणाची चर्चा झाल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे दोन्ही गटांतील मतभेद अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.

 शशिकांत शिंदे यांचा मोठा दावा

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde यांनी एका लेखातून महत्त्वाचा दावा केला आहे. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार होते आणि त्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला होता, असे त्यांनी म्हटले. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले. ते स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे आवाहनही शिंदे यांनी केले.

पुढे काय?

दोन्ही गटांतील नेत्यांचे परस्परविरोधी दावे आणि सूचक वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत उत्सुकता वाढली आहे. अजित पवार गटाकडून या नव्या विधानांवर काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.