- Home
- Maharashtra
- Mumbai Local News: भाडे वाढ नाही, पण लोकल होणार AC! मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईकरांना मोठी भेट
Mumbai Local News: भाडे वाढ नाही, पण लोकल होणार AC! मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईकरांना मोठी भेट
CM फडणवीस यांनी मुंबईकरांसाठी मोठी घोषणा केली असून, उपनगरीय लोकलचे सर्व डबे मेट्रोप्रमाणे पूर्णपणे वातानुकूलित (AC) आणि स्वयंचलित दरवाजांसह आधुनिक होणारय. विशेष म्हणजे, या बदलासाठी सेकंड क्लासच्या प्रवाशांना कोणतीही भाडेवाढ सहन करावी लागणार नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईकरांना मोठी भेट
मुंबई: मुंबईच्या उपनगरीय लोकलला “मेट्रोसारखा आराम” मिळणार आहे. तेही एक रुपयाचीही भाडेवाढ न करता अशी भल्यामोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात केली. मुंबईकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी ठरणार आहे.
आधुनिक लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार
लोकल हा मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग. दररोज लाखो प्रवासी गर्दीने भरलेल्या डब्यांमध्ये, अनेकदा दरवाजात लटकत जीव धोक्यात घालून प्रवास करतात. यामुळे घडणाऱ्या दुर्घटनांची संख्या कमी करण्यासाठी आता ऑटोमॅटिक दरवाजे असलेली आधुनिक लोकल सेवेत दाखल होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लोकलचे कोचेस होतील पूर्णपणे AC, दरवाजेही स्वयंचलित
कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, “मुंबई उपनगरीय लोकल ही शहराची खरी लाईफलाईन आहे. रोज जवळपास 90 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षित आणि आरामदायक प्रवासासाठी आम्ही लवकरच लोकलचे सर्व कोचेस मेट्रोसारखे पूर्णपणे एसी करणार आहोत. तसेच प्रत्येक दरवाजातून स्वयंचलितपणे उघड–बंद होण्याची सुविधा असेल. आणि सर्वात महत्त्वाचे सेकंड क्लासचे भाडे अजिबात वाढवले जाणार नाही.” ही घोषणा होताच मुंबईतून प्रवास करणार्या लाखो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
2032 पर्यंत मुंबईचा संपूर्ण कायापालट
मुंबईत सध्या सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की सर्व कामे 2032 पर्यंत पूर्ण होतील. शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठा रस्ते–जाळा, उड्डाणपूल, तसेच अनेक बोगदे बांधले जात आहेत. या बोगद्यांच्या विस्तृत जाळ्याला त्यांनी विनोदी शैलीत ‘पाताळ लोक’ असे संबोधले. सध्या मुंबईत पीक अवरमध्ये वाहनांचा वेग फक्त 15–20 किमी प्रतितास इतका राहतो. मात्र सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा वेग थेट 80 किमी प्रतितास पर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या नव्या मार्गांमुळे मुंबईत न येताही नवी मुंबई किंवा वसई–विरारपर्यंत थेट पोहोचणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांसाठी आशेचा किरण
AC लोकल, स्वयंचलित दरवाजे, सुधारलेली पायाभूत सुविधा आणि कोंडीमुक्त रस्ते या सर्व घोषणांमुळे मुंबईकरांच्या प्रवासाला नवी दिशा मिळणार हे निश्चित. भाडेवाढ न करता आधुनिक सोयी देण्याचा निर्णय ही नक्कीच मोठी सकारात्मक पायरी ठरणार आहे.

