- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Update: कधी पाऊस, कधी ऊन! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा उलटफेर; रविवारी तुमच्या शहरात काय असेल स्थिती?
Maharashtra Weather Update: कधी पाऊस, कधी ऊन! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा उलटफेर; रविवारी तुमच्या शहरात काय असेल स्थिती?
Maharashtra Weather Update: महाराष्ट्राच्या हवामानात उलटफेर झाला असून काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर मुंबईसह कोकणात उष्णतेचा 'यलो अलर्ट' जारी केलाय. विदर्भ, मराठवाड्यात काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कधी पाऊस, कधी ऊन! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा उलटफेर
मुंबई: महाराष्ट्रातील हवामानाचा लपंडाव सुरूच असून, पुढील २४ तासांत राज्यावर पुन्हा एकदा 'दुहेरी संकट' घोंघावत आहे. मार्च महिना संपत असतानाच राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे उन्हाचा पाराही चाळीसच्या जवळ पोहोचला आहे. २२ मार्च रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरणार असला तरी, उकाडा आणि दमट हवामान नागरिकांची पाठ सोडणार नाहीये.
कोकण आणि मुंबई: उष्णतेचा 'यलो अलर्ट'
कोकणातील अवकाळीचे संकट सध्या टळले असले तरी, मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर आता उष्ण आणि दमट हवामानाचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने मुंबई आणि कोकणासाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. घामाच्या धारांमुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडण्याची शक्यता आहे.
विदर्भ-मराठवाडा: विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे पुनरागमन?
गेल्या काही दिवसांत गारपिटीने झोडपून काढलेल्या विदर्भात रविवारी (२२ मार्च) हवामान काहीसे कोरडे राहील. मात्र, हा दिलासा अल्पकाळ टिकणार असून २४ मार्चपासून पुन्हा एकदा वादळी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत हवामान कोरडे असेल, पण लातूर आणि धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.
मध्य आणि उत्तर महाराष्ट्र: कुठे पाऊस, कुठे ऊन?
पुणे, सातारा आणि नाशिक: या भागात हवामान मुख्यत्वे कोरडे राहील आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
दक्षिण महाराष्ट्र: सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर परिसरात ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
२३ मार्चपासून पुन्हा एकदा वादळी पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतीकामांचे नियोजन करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

