- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Update: गुढीपाडव्याच्या आनंदावर अवकाळीचं सावट; महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांना 'हाय अलर्ट', तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
Maharashtra Weather Update: गुढीपाडव्याच्या आनंदावर अवकाळीचं सावट; महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांना 'हाय अलर्ट', तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
Maharashtra Weather Update: गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ३१ जिल्ह्यांना अलर्ट दिला असून, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

गुढीपाडव्याच्या आनंदावर अवकाळीचं सावट
मुंबई: यंदाचा गुढीपाडवा (१९ मार्च) केवळ सणच नाही, तर निसर्गाच्या लहरीपणाचाही साक्षीदार ठरणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात 'वादळी पावसाची' एन्ट्री होणार आहे. तब्बल ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून, यात ७ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर राहण्याची शक्यता आहे.
कुठल्या विभागाला कोणता अलर्ट?
१. उत्तर महाराष्ट्र: नाशिक-जळगावला 'ऑरेंज अलर्ट'
नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहतील. मेघगर्जनेसह मध्यम पावसाची आणि काही ठिकाणी गारपिटीची (Hailstorm) शक्यता असल्याने शेतीमालाचे नुकसान होण्याची भीती आहे. धुळे आणि नंदुरबारला 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
२. मराठवाडा: विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर हिंगोली, लातूर आणि धाराशिवमध्ये 'यलो अलर्ट' असून शेतकऱ्यांनी कापणीला आलेल्या पिकांची त्वरित सुरक्षित विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
३. कोकण आणि मुंबई: पावसाची रिमझिम
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीला मात्र पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. मुंबईत उकाडा कायम राहणार असून कमाल तापमान ३२-३६ अंशांच्या आसपास राहील.
४. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये अवकाळीचा 'यलो अलर्ट' असेल. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांत ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो.
महत्त्वाच्या सूचना
शेतकऱ्यांसाठी: कापणी झालेला माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा. गारपिटीची शक्यता असलेल्या भागात विशेष काळजी घ्या.
नागरिकांसाठी: गुढी उभी करताना किंवा बाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्या. वादळी वाऱ्यावेळी झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली आडोसा घेणे टाळा.

