- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला पावसापासून दिलासा, पण अजूनही धोका कायम; 3 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला पावसापासून दिलासा, पण अजूनही धोका कायम; 3 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ५ ऑक्टोबरला हवामान बदलणार असून, पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा असून विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
मुंबई: 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात बदल पाहायला मिळणार आहेत. काही भागांत आता पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली असली तरी, अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/fj5OWDnVes
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 4, 2025
राज्यात कुठे कसा राहणार पाऊस?
हवामान विभागानुसार, 5 ऑक्टोबर रोजी राज्यभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि कोकण
मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही असाच पाऊस होऊ शकतो.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. घाटमाथा भागात मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे. काही ठिकाणी वादळी वारे देखील होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हलक्याच पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि घाटमाथ्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
विदर्भ – 3 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरडे वातावरण राहील. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही.
मात्र चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसोबत पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हवामान विभागाने येथे "यलो अलर्ट" जारी केला आहे. नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी.
शेतकऱ्यांसाठी सूचना
राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही हवामान अस्थिर आहे. त्यामुळे शेती कामे करताना किंवा प्रवास करताना हवामान विभागाच्या सूचना आणि अलर्टकडे लक्ष द्यावे.

