भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या बीकानेर, दिल्ली, लखनऊ, पाटणा मार्गे मणिपूरपर्यंत विस्तारला आहे. तो समुद्रसपाटीपासून सुमारे 0.9 किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय आहे. या प्रणालीमुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मंगळवारी पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अलर्ट देण्यात आलेला नाही. तरी दिवसभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बुधवारीही पावसाचा प्रभाव कायम

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारपर्यंत पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला असून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.