रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. मुंबईहून देवरुखला जाणाऱ्या कुटुंबाची कार १०० फूट खोल नदीपात्रात कोसळली. चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी, १९ मे २०२५: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाची कार पुलावरून १०० फूट खोल नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारास भरधाव वेगात असलेल्या कारचा चालक नियंत्रण गमावल्यामुळे कार थेट पुलावरून खाली कोसळली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. चालकावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मृतांमध्ये विवेक श्रीराम मोरे, मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत, आणि मेघा परमेश पराडकर यांचा समावेश आहे. हे सर्वजण मुंबईतील रहिवासी असून, एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी देवरुखला निघाले होते. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली असून, वाहनाच्या वेगावर नियंत्रण न राहिल्याची शक्यता वर्तवली जात आहे.