पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विरोधकांवर टीका केली. त्यांनी २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुकारलेल्या ऑपरेशन सिंदुरवर टिका करणार्यांचा समाचार घेतला.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) लोकसभेत बोलताना विरोधकांवर टीकेची झोड उठवली. जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईवरून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर तीव्र शब्दांत प्रहार केला. त्यांनी आरोप केला की, विरोधक सतत लष्करी कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून त्यासाठी नवनवीन निमित्त शोधत आहेत.
मोदी म्हणाले, “दहशतवादी रडत आहेत, त्यांचे सूत्रधार रडत आहेत आणि इथे काही लोक त्यांना पाहून रडत आहेत. सर्जिकल स्ट्राईकवेळी त्यांनी शंका उपस्थित केली. हवाई हल्ल्यावरही प्रश्न उभे केले. आता ऑपरेशन सिंदूरवर तेच चालू आहे. ते म्हणतात 'तुम्ही का थांबलात?' काय युक्तिवाद आहे! विरोधासाठी निमित्त लागतं त्यांना. त्यामुळे आज संपूर्ण देश त्यांच्या या वागणुकीवर हसतो आहे.”
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला विशेषतः लक्ष्य केलं. “सशस्त्र दलांवर शंका घेणे, त्यांच्या कारवायांबाबत नकारात्मकता पसरवणे, हा काँग्रेसचा जुनाच पवित्रा आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “पाकिस्तानची विधाने आणि आपल्या विरोधकांची विधाने वाचली, तर ती पूर्णविराम आणि स्वल्पविरामासह सारखीच वाटतात,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
"भारत हा बुद्धाचा देश आहे, युद्धाचा नाही"
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारत हा बुद्धाचा देश आहे. आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो. आम्हाला समृद्धी आणि शांतता हवी आहे. पण ही शांतता टिकवण्यासाठी ताकद आवश्यक असते. आणि ऑपरेशन सिंदूर ही ताकद दाखवण्याची गरज होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसकडून टीका आणि प्रश्न
याचवेळी काँग्रेस खासदार आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न उपस्थित करत म्हटलं, “पहलगाम हल्ल्याचे पुरावे कुठे आहेत? हे दहशतवादी खरोखरच पाकिस्तानातून आले होते याचा पुरावा सरकारने दिला नाही.” त्यांनी सरकारवर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत ऑपरेशनबाबत सविस्तर माहिती न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
“सरकारकडे लढण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही” राहुल गांधींचा गंभीर आरोप
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, “संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की ऑपरेशन सिंदूर पहाटे १.०५ वाजता सुरू झाले आणि २२ मिनिटांत संपले. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, रात्री १.३५ वाजता भारत सरकारने पाकिस्तानला फोन करून सांगितले की आम्ही गैर-लष्करी ठिकाणांवर हल्ला केला आहे आणि तणाव वाढवायचा नाही.”
राहुल गांधी पुढे म्हणाले, “ही गोष्ट संरक्षण मंत्र्यांनी स्वतः जाहीर केली. म्हणजेच, भारत सरकारने पाकिस्तानला थेट कळवले की भारत लढणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. भारताकडे लढण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही.”
राजकीय वातावरण तापले
पंतप्रधान मोदींच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या या टीका-प्रतिटिकांमुळे संसदेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे सरकार म्हणते की देशाची सुरक्षा आणि सैन्याची प्रतिमा राखण्यासाठी कठोर निर्णय आवश्यक असतात, तर दुसरीकडे विरोधक सरकारवर गुप्ततेचा आणि निर्णयक्षमतेच्या अभावाचा आरोप करत आहेत.


