मुंबईच्या नौसेना डॉकयार्डमधील एका ज्युनियर मेकॅनिकल इंजिनिअरला भारतीय नौसेनेची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याने बनावट फेसबुक खात्यांद्वारे ही माहिती शेअर केली आणि त्यामुळे त्याचे लग्नही मोडले आहे.

मुंबईच्या नौसेना डॉकयार्डमध्ये कार्यरत असलेल्या रविकुमार वर्मा या २७ वर्षीय ज्युनियर मॅकेनिकल इंजिनिअरला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने भारतीय नौसेनेच्या १४ पाणबुड्या आणि युद्धनौकांची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयला पुरवली आहे. या प्रकरणात त्याने फेसबुकवरील 'पायल शर्मा' आणि 'इसप्रीत' या बनावट खात्यांद्वारे संपर्क साधल्याचे उघड झाले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

वर्मा ठाण्याच्या कळवा परिसरात राहणारा असून, तो २०२४ पासून आयएसआयच्या संपर्कात होता. नौसेना डॉकमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी असल्यामुळे, त्याने जहाजांची रचना आणि तांत्रिक माहिती लक्षात ठेवून ती फेसबुकद्वारे पाठवली. ही माहिती ऑडिओ आणि मजकूर स्वरूपात शेअर केली गेली.

या प्रकरणामुळे वर्माच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा धक्का बसला आहे. त्याचा साखरपुडा झालेला असून, एटीएसच्या अटकेनंतर त्याचे लग्न मोडले आहे. वधूच्या कुटुंबीयांनी त्याच्या गद्दारीमुळे नातं तोडलं असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सध्या एटीएस वर्माच्या सोशल मीडिया खात्यांची आणि मोबाईलची तपासणी करत आहे. या प्रकरणामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, नौसेनेतील गोपनीयतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.