मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधील एक असा नियम त्याला बदलण्याची इच्छा असल्याचे व्यक्त केले आहे. खरंतर, सचिनने डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमच्या नियमासंदर्भात हे विधान केले आहे. 

मुंबई : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम (DRS) मधील अंपायर कॉल हा नियम बदलण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय बदलण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे खेळ अधिक गुंतागुंतीचा झाला असून, अनेकदा गोंधळ निर्माण होतो असे सचिनचे मत आहे.

२००९ मध्ये DRS लागू झाल्यानंतर अंपायरचा कॉल हा शब्दप्रयोग क्रिकेटचा अविभाज्य भाग झाला. काहींनी या नियमाचे समर्थन केले, तर काहींनी नाराजीही व्यक्त केली. याच संदर्भात सचिन म्हणाले,

“मी अंपायर कॉलवरचा नियम बदलून टाकेन. मैदानावरील पंचांचा निर्णय खेळाडूंना पटत नसेल, तर ते वरच्या मजल्यावर निर्णयासाठी जातात. अशा वेळी पुन्हा त्याच पंचांच्या कॉलवर परत जाण्याचा पर्याय योग्य नाही. खेळाडूंप्रमाणे पंचांच्याही कामगिरीत वाईट पॅच येतात. तंत्रज्ञान चुकीचे असले, तरी ते सातत्याने एकाच पद्धतीने चुकीचे राहते.”

सध्या एखादा संघ मैदानावरील निर्णयाला आव्हान देतो तेव्हा अंतिम निर्णयासाठी तांत्रिक पुरावे पाहिले जातात. मात्र, जेव्हा पुरावे अनिर्णीत असतात तेव्हा पंचांच्या मूळ निर्णयाला मान्यता दिली जाते. विशेषतः एलबीडब्ल्यूच्या निर्णयावेळी अंपायर कॉल लागू होतो. जर चेंडूचा ५० टक्क्यांपेक्षा कमी भाग स्टंपला लागत असेल, तर पंचांचा पहिला निर्णय कायम राहतो.

‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांनी १९८९ ते २०१३ या काळात आपल्या अप्रतिम फलंदाजीने जगभरातील चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्यांनी ४८.५२ च्या सरासरीने तब्बल ३४,३५७ धावा** केल्या. त्यांची १०० शतके आणि १६४ अर्धशतके ही जागतिक विक्रम आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक झळकावणारा सचिन हा एकमेव खेळाडू ठरला आहे.