केंद्र सरकारने भात आणि कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या कार्बॉसल्फान कीटकनाशकावर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

मुंबई : केंद्र सरकारने एका महत्त्वाच्या निर्णयाचा प्रस्ताव ठेवला आहे. भारतात भात, कापूस आणि बागायती पिकांवर मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या 'कार्बॉसल्फान' (Carbosulfan) या कीटकनाशकावर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबद्दल एक सरकारी आदेशाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. हे कीटकनाशक मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक असल्याचं सरकारने म्हटलं आहे. या आदेशानुसार, या कीटकनाशकाची आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल.

बंदीची अंमलबजावणी कशी होणार?

सरकारने नोंदणी समितीला (Registration Committee) या कीटकनाशकासाठी दिलेले सर्व नोंदणी प्रमाणपत्र मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. "ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र आहे, त्यांनी ते तीन महिन्यांच्या आत समितीकडे परत न केल्यास, कीटकनाशक कायद्यानुसार (Insecticides Act) त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असं या मसुद्यात स्पष्ट म्हटलं आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांनाही या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यास सांगितलं आहे.

तज्ज्ञ समितीचा अहवाल आणि शिफारस

हा निर्णय का घेतला जात आहे? कृषी मंत्रालयाने १४ जानेवारी २०२६ रोजी भारतात कार्बॉसल्फानच्या वापराचा आढावा घेण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल १२ जून २०२६ रोजी सरकारला सादर केला.

त्यानंतर सरकारने १९६८ च्या कीटकनाशक कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या नोंदणी समितीचा सल्ला घेतला. उपलब्ध अभ्यास, डेटा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांचा आढावा घेतल्यानंतर, नोंदणी समितीने भारतात कार्बॉसल्फानवर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस केली.

समितीच्या अहवालात काय म्हटलंय?

नोंदणी समितीने आपल्या शिफारशीत म्हटलं आहे की, "कार्बॉसल्फान हे मूळतः एक अत्यंत धोकादायक कार्बामेट कीटकनाशक आहे. शरीरात गेल्यानंतर त्याचं रूपांतर 'कार्बोफ्युरान' (Carbofuran) नावाच्या आणखी विषारी घटकात होतं. यामुळे मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होतो. हे कीटकनाशक पक्षी, मधमाश्यांसारखे परागीभवन करणारे कीटक, पाण्यातील जीव आणि इतर प्राण्यांसाठीही खूप विषारी आहे. अनेक देशांमध्ये यावर बंदी किंवा कठोर निर्बंध आहेत."

सर्वात चिंतेची बाब म्हणजे, "कार्बॉसल्फानमुळे विषबाधा झाल्यास त्यावर कोणताही विशिष्ट उतारा (antidote) उपलब्ध नाही," असंही समितीने नमूद केलं आहे. याच कारणांमुळे, या कीटकनाशकाचा वापर सुरू ठेवल्यास सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असं सांगत समितीने १९६८ च्या कीटकनाशक कायद्याअंतर्गत यावर तात्काळ बंदी घालण्याची शिफारस केली आहे.