जागतिक बँकेच्या अहवालानुसार, शहरांमधील वाढत्या उष्णतेमुळे 2050 पर्यंत शहरी गरीबांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हवामान बदल आणि शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या या संकटावर मात करण्यासाठी अहवालात हरित क्षेत्र वाढवणे आणि शाश्वत तंत्रज्ञान वापरण्यासारखे उपाय सुचवण्यात आले आहेत.

शहरांमधील वाढत्या उष्णतेमुळे भविष्यात मोठे संकट निर्माण होऊ शकते, असा गंभीर इशारा जागतिक बँकेच्या अहवालातून देण्यात आला आहे. 2050 पर्यंत धोकादायक उष्णतेचा फटका बसणाऱ्या शहरी गरीबांची संख्या तब्बल 700 टक्क्यांनी वाढू शकते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः विकसनशील देशांतील शहरांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक मानली जात आहे.

कोणावर होतोय परिणाम 

अहवालानुसार, शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, काँक्रीटचे जंगल, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि हवामान बदल यामुळे ‘अर्बन हीट आयलंड’ प्रभाव वाढत आहे. त्यामुळे शहरांतील तापमान आसपासच्या भागांपेक्षा अनेक अंशांनी जास्त नोंदवले जात आहे. याचा थेट परिणाम रस्त्यावर काम करणारे मजूर, वृद्ध, महिला आणि लहान मुलांवर होत आहे.

तंत्रज्ञान वापरण्याचा दिला सल्ला 

उष्णतेमुळे रोजगारावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तापमान वाढल्याने बाहेर काम करणाऱ्या कामगारांचे कामाचे तास कमी होतात, उत्पादन घटते आणि उत्पन्नावर परिणाम होतो. त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या वाढून रुग्णालयांवरील ताणही वाढू शकतो. जागतिक बँकेने या संकटावर उपाय म्हणून शहरांसाठी विशेष मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. त्यात हरित क्षेत्र वाढवणे, झाडांची लागवड, थंड छतांची संकल्पना, नैसर्गिक वायुवीजन असलेल्या इमारती आणि कमी खर्चातील शाश्वत कूलिंग तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तज्ज्ञांच्या मते, उष्णतेकडे केवळ उन्हाळ्यातील त्रास म्हणून पाहणे धोकादायक ठरेल. योग्य नियोजन न केल्यास शहरांमध्ये स्थलांतर, दारिद्र्य आणि असमानता वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन, सरकार आणि नागरिकांनी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. आगामी काळात शहरांना सुरक्षित ठेवायचे असेल तर हवामान बदलाशी जुळवून घेणारी पायाभूत सुविधा उभारणे अत्यावश्यक ठरणार आहे. अन्यथा वाढती उष्णता लाखो लोकांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम करू शकते, असा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे.