नागपुरात सुनेनं सासूची सुपारी देऊन का केली हत्या?, धक्कादायक कारण आलं समोर

| Published : Sep 10 2024, 07:45 PM IST

nagpur murder

सार

नागपुरात संपत्तीच्या वादातून एका महिलेने आपल्या चुलत भावांना सुपारी देऊन सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृताच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता सत्य उघड झाले.

नागपुरात संपत्तीच्या वादात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 32 वर्षीय वैशाली राऊतने आपल्या सासूची हत्या करण्यासाठी स्वतःच्या चुलत भावांना 2 लाख रुपयांची सुपारी दिली. ही धक्कादायक घटना नागपुरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मित्र नगरमध्ये घडली आहे.

आरोपी वैशालीचा पती अखिलेश राऊत दारूच्या व्यसनामुळे गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यांचे सासरे ओमकार राऊत यांचाही 2016 मध्ये मृत्यू झाला. वैशाली, तिची सासू सुनिता राऊत आणि एक अन्य व्यक्ती या घरात राहात होते. सुनिता आणि वैशाली यांच्यात सतत वाद होते असत, ह्या वादांच्या पार्श्वभूमीवर वैशालीने सासूला संपवण्याचा कट रचला.

नेमकं हत्येमागचे कारण काय?

अजनी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी सांगितले की, सासू सुनिता आणि सून वैशाली यांच्यात अधूनमधून भांडण होत होती. सुनिता सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत होत्या. वैशालीचे बाळ लग्नाआधीचे असल्याचा आरोप करत सासू नेहमी चारित्र्यावरून त्यांना बोलायची. तसेच मुलीला आम्ही सांभाळू तू घरातून निघून जा असंही सतत तिला म्हणायच्या. सासूच्या अशा बोलण्याला कंटाळूनच सून वैशालीने त्यांना संपवायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे राहणारा त्यांचा चुलत भाऊ श्रीकांत हिवसेची मदत घेतली.

28 ऑगस्ट रोजी, वैशालीने तिच्या चुलत भावांना सासूची हत्या करण्याची सुपारी दिली. श्रीकांत हिवसे आणि त्याचा साथीदार यांनी रात्री 11 वाजता सुनिता यांची गळा दाबून हत्या केली. वैशालीने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव तयार केला, परंतु मृत शरीरावर माराचे लाल डाग आढळल्यामुळे नातेवाईकांनी संशय घेतला.

असा रचला हत्येचा कट

सुरुवातीला श्रीकांत हत्येसाठी तयार नव्हता. पण, वैशालीने त्याला 2 लाख रुपये देते असे सांगितले. हळूहळू तिने भावाला ऑनलाईन पैसे पाठवायला सुरुवातही केली. एवढंच नाही तर, तू माझ्या सासूच्या हत्येची सुपारी घेतली नाही तर, मी तुझ्या नावाने पत्र लिहून आत्महत्या करेन, अशी धमकीही तिने भावाला दिली होती. त्यामुळे श्रीकांतने एका साथीदाराला सोबत घेऊन सुनिता यांच्या हत्येचा कट रचला.

नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली आणि वैशालीच्या फोन तपासणीत चुलत भावांसोबत सततच्या संपर्काचे संकेत सापडले. पोलिसांनी वैशाली, श्रीकांत आणि दुसऱ्या चुलत भावाला अटक केली. या घटनेने नागपुरात धक्का दिला असून, संबंधित आरोपींच्या अटकेनंतर सत्य समोर आले आहे.

आणखी वाचा : 

पतीने पत्नीवर 72 जणांकडून 92 वेळा केला बलात्कार, स्वत:च पत्नीला देत होता ड्रग्ज