Pakistan Air Strike पाकिस्तानी वायुदलाने बलुचिस्तानमधील आपल्याच लोकांवर एअर स्ट्राईक केला. त्यात सुमारे ३० निरपराध लोक मृत्युमुखी पडले आहेत. यात काही महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात एका गावाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे.
Pakistan Air Strike ः पाकिस्तानी सैन्य दलाने स्वतःच्या पश्तून नागरिकांवर हवाई हल्ला केला असून यात महिला आणि मुलांसह तब्बल ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मत्रे दारा गावावर रात्री सुमारे दोन वाजता पाकिस्तानी वायुसेनेने JF-17 लढाऊ विमानांतून किमान आठ बॉम्ब टाकले. यात ३० हून अधिक निरपराध नागरिकांचा बळी गेला. मात्र या हल्ल्याबाबत पाकिस्तानी सरकारने अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.
मृतांमध्ये बहुसंख्य महिला आणि लहान मुले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. बॉम्बफेकीमुळे गावाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून ठिकठिकाणी मृतदेह पडलेले आहेत.
स्थानिक रहिवाशांच्या मते, गावकरी झोपलेले असताना अचानक जोरदार स्फोट झाले. हल्ला इतका भीषण होता की अनेक घरे पूर्णपणे कोसळली आणि सगळीकडे फक्त मलबा दिसत आहे. गावातील रस्ते आणि गल्ल्या ढिगाऱ्याने भरून गेल्या आहेत, त्यामुळे बचावकार्य आणि मदत पोहोचवणे खूप कठीण झाले आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या व्हिडिओंमध्ये गावाची झालेली उध्वस्त अवस्था आणि जखमींच्या आर्त किंकाळ्या स्पष्ट ऐकू येत आहेत.
अजूनही अनेक लोक मलब्याखाली दडलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोक स्वतःच्या पातळीवर बचावकार्य करत असून बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे.
दरम्यान, स्वतःच्या नागरिकांवर झालेल्या या निर्दयी हवाई हल्ल्याबाबत पाकिस्तानी सरकारकडून अजून कोणतेही निवेदन आलेले नाही. मात्र ही घटना पाकिस्तानमध्ये ‘दहशतवादविरोधी कारवाई’च्या नावाखाली चालणाऱ्या सैन्याच्या क्रूरतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था या हल्ल्याची तीव्र निंदा करत असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. ही घटना पाकिस्तानमधील अंतर्गत संघर्षाचाही पर्दाफाश करते.


