Pakistan Afghanistan tension : पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूलसह अनेक महत्त्वाच्या तालिबानी ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले आहेत. सीमेवर झालेल्या हल्ल्याला हे प्रत्युत्तर असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. 

Pakistan Afghanistan tension : अफगाणिस्तानने गुरुवारी पाकिस्तानी सैन्यावर हल्ला चढवला असून काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल डझनभर सैनिकांना ठार केल्याचा आणि काहींना जिवंत पकडल्याचा दावा केला आहे.

सीमेवरील अनेक ठिकाणी करण्यात आलेली ही कारवाई अलीकडच्या महिन्यांत दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सीमावाद आणि पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांच्या मालिकेनंतर करण्यात आली आहे.

“पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार होणाऱ्या उल्लंघनांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्करी तळ आणि ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर आक्रमक कारवाया सुरू करण्यात आल्या,” असे तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले.

कुनार प्रांतातील राज्यपाल कार्यालय आणि स्थानिक नागरिकांनी एएफपीला सांगितले की, लष्करी कारवाई सुरू आहे. तसेच अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर अनेक प्रांतांमध्येही सशस्त्र दल सक्रिय आहे.

पाकिस्तानने या हल्ल्याला “तत्काळ आणि प्रभावी प्रत्युत्तर दिले जात आहे” असे म्हटले आहे.

माहिती मंत्रालयाने ‘एक्स’वर लिहिले की, तालिबान दलांनी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अनेक भागांमध्ये गोळीबार केला आणि पाकिस्तानी सैन्याने तत्काळ आणि प्रभावी प्रत्युत्तर देत मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवली तसेच अनेक चौक्या व उपकरणे नष्ट केली.

इस्लामाबादच्या माहिती मंत्रालयाने म्हटले की, अफगाणिस्तानने खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सीमेवर “अनाहूत गोळीबार” केला.

तालिबान सरकारच्या प्रवक्त्यांनी एएफपीला सांगितले की, अफगाण सैन्याने दोन तासांत पाकिस्तानी सैन्याच्या १५ हून अधिक चौक्या ताब्यात घेतल्या.

“डझनावधी पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून १० मृतदेह कुनार आणि इतर भागांत हलवण्यात आले आहेत. अनेक जखमी असून काहींना जिवंत पकडण्यात आले आहे,” असे मुजाहिद यांनी सांगितले.

अफगाण बाजूच्या हानीबाबत तत्काळ कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.

अनेक महिन्यांपासून सीमावाद

या लष्करी कारवाईपूर्वी रविवारी रात्री पाकिस्तानने नंगरहार आणि पक्तिका प्रांतांवर हवाई हल्ले केले होते. अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्र मिशनच्या माहितीनुसार या हल्ल्यांत किमान १३ नागरिक ठार झाले.

तालिबान सरकारने किमान १८ जण ठार झाल्याचे सांगितले आणि पाकिस्तानने ८० हून अधिक दहशतवादी ठार केल्याचा दावा फेटाळून लावला.

मंगळवारी दोन्ही बाजूंनी सीमापार गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे, मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अलीकडच्या महिन्यांत दोन्ही शेजारी देशांतील संबंध ताणले गेले आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या भीषण चकमकीत दोन्ही बाजूंचे ७० हून अधिक लोक ठार झाल्यानंतर बहुतांश भूप्रदेशीय सीमारेषा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

कतार आणि तुर्कस्तानच्या मध्यस्थीने युद्धविराम जाहीर करण्यात आला होता आणि त्यानंतर अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या; मात्र कायमस्वरूपी तोडगा निघू शकलेला नाही.

या महिन्यात सौदी अरेबियानेही हस्तक्षेप करून ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्तानने पकडलेल्या तीन पाकिस्तानी सैनिकांची सुटका घडवून आणली.

इस्लामाबादचा आरोप आहे की, पाकिस्तानमध्ये हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अफगाणिस्तान अपयशी ठरत आहे; मात्र तालिबान सरकारने हे आरोप फेटाळले आहेत.

अलीकडील आत्मघाती हल्ल्यांच्या मालिकेनंतर पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले होते.

त्यात इस्लामाबादमधील शिया मशिदीवरील हल्ल्याचा समावेश होता, ज्यात किमान ४० जण ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.

या संघटनेच्या प्रादेशिक शाखा ‘इस्लामिक स्टेट-खोरासान’ने गेल्या महिन्यात काबूलमधील एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटाचीही जबाबदारी स्वीकारली होती.