India Pakistan Hockey Match: मलेशियातील सुलतान ऑफ जोहोर कपमध्ये भारत-पाकिस्तानच्या युवा हॉकीपटूंनी मैत्रीचा संदेश दिला, जो अलीकडील क्रिकेट सामन्यांमधील हस्तांदोलन वादाच्या अगदी विरुद्ध होता. 

भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये राजकीय आणि क्रीडा पातळीवर कायमच तणाव पाहायला मिळतो. मात्र, मलेशियामधील सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धेत मंगळवारी (14 ऑक्टोबर) काहीसं वेगळं दृश्य पाहायला मिळालं. भारत आणि पाकिस्तानच्या अंडर-21 हॉकी खेळाडूंनी सामन्यापूर्वी एकमेकांना हाय-फायव्ह देत मैत्री आणि सौहार्दतेचा संदेश दिला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

राष्ट्रगीतांच्या नंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना अभिवादन करत सामन्याची सुरुवात केली. अलीकडेच आशिया कप आणि महिला क्रिकेट विश्वचषक सामन्यांमध्ये हस्तांदोलन टाळण्याचे प्रकार घडल्याने, हा क्षण विशेष महत्त्वाचा ठरला.

हस्तांदोलन नाकारण्याचा क्रिकेटमधील वाद

गेल्या महिन्यात आशिया कपमध्ये आणि त्याआधी महिला विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी औपचारिक अभिवादन टाळलं होतं. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानी खेळाडूंना सामन्यानंतर हस्तांदोलनासाठी हात पुढे न करता, पाहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बळींना आदरांजली अर्पण केल्याचं सांगितलं.

मात्र, यावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC) कडे तक्रार दाखल करत यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. भारताने देखील पाकिस्तानी खेळाडू हारिस रऊफ आणि साहिबझादा फर्हान यांच्यावर उद्देशपूर्वक आक्षेपार्ह खुणा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. विशेषतः रऊफचं "जेट क्रॅशिंग" आणि "6-0" सूचित करणं, तसेच फर्हानचं बंदूक डोक्यावर नेण्याचं नाटक वादाचा मुद्दा ठरलं.

या वादाची परिणती ट्रॉफी वितरण सोहळ्यातही दिसून आली, जिथे भारतीय खेळाडूंनी ACC अध्यक्ष मोसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे कार्यक्रम गोंधळात पार पडला आणि ट्रॉफी औपचारिक सन्मानाविना मंचावरून हटवण्यात आली.

हॉकीत सौहार्दाचा संदेश

क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या राजकीय रंगलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, हॉकीच्या मैदानावर दिसलेली खेळभावनेची झलक सकारात्मक वाटते. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (PHF) आधीच आपल्या खेळाडूंना सुचना दिल्या होत्या – भारतीय संघ हस्तांदोलन टाळला, तरी शांत राहा, प्रतिक्रिया देऊ नका.

PTI च्या अहवालानुसार, PHF अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले, “खेळात कोणताही भावनिक उद्रेक नको. खेळावर लक्ष द्या. हस्तांदोलन झाला नाही, तरी काही हरकत नाही संयम ठेवा.”

दरम्यान, पाकिस्तानने 2025 मध्ये बिहारच्या राजगीरमध्ये होणाऱ्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेतून तांत्रिक कारणास्तव माघार घेतली आहे. ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कपमध्ये मात्र भारत आणि पाकिस्तान एका गटात आहेत, त्यामुळे पुढे काय होतं हे पाहावं लागेल.

मैत्रीचा खेळभावना VS तणावाचा शड्डू

सुलतान ऑफ जोहोर कपमध्ये भारत-पाकिस्तानच्या युवा हॉकीपटूंनी दाखवलेली परिपक्वता आणि मैत्रीचा संदेश हा केवळ हॉकीपुरता मर्यादित नाही तर तो क्रिकेट आणि राजकीय वादांनी गढलेल्या क्रीडाजगतातील एक आशेचा किरण ठरतो. शेवटी, खेळ हा तणावाचा नाही, तर एकत्र येण्याचा मार्ग असावा, हेच या तरुण खेळाडूंनी जगाला दाखवून दिलं आहे.