बाल स्वास्थ्य योजना गांगुर्डे कुटुंबासाठी ठरली संजीवनी! मुलाला श्रवणशक्ती मिळाल्याने आयुष्यच बदललं

| Published : Dec 02 2023, 03:26 PM IST / Updated: Dec 04 2023, 01:45 PM IST

 Bal Swasthy Yojana

सार

Bal Swasthya Yojana : जामनेर तालुक्यातील नांद्रा गावातील वसंत गांगुर्डे आणि सरिता गांगुर्डे या दाम्पत्याला आपल्या मुलाला बोलता तसंच ऐकता येत नाहीय, ही धक्कादायक बाब एक वर्षभरानंतर समजली. अन् मग... 

Bal Swasthya Yojana : आपल्या मुलाला जन्मजातच ऐकता येत नाहीय, हे कळल्यानंतर पालकांच्या मनावर काय परिणाम होत असतील? याची कल्पनाही करणं कठीणच. जामनेर तालुक्यातील नांद्रा गावातील वसंत गांगुर्डे आणि सरिता गांगुर्डे या दाम्पत्याच्या आयुष्यातही असेच काहीसे घडले होते. आपला मुलगा रूदुराजला बोलता तसंच ऐकता येत नाहीय, ही धक्कादायक बाब गांगुर्डे दाम्पत्याला तब्बल वर्षभरानंतर समजली. ही बाब लक्षात आल्यानंतर लेकराच्या काळजीमुळे त्यांच्या चिंतेत भर पडली.

लाखो रूपयांचा न परवडणारा खर्च

आपलं मुल लवकरात लवकर बरे व्हावे, त्याला ऐकू यावे म्हणून गांगुर्डे दाम्पत्याने जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या खासगी हॉस्पिटलमध्ये कित्येक वैद्यकीय तपासण्या केल्या. रिपोर्ट्स पाहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना कॉक्लियर इम्प्लांट ही अवघड शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेसाठी तब्बल आठ ते 10 लाख रूपयांचा खर्च करावा लागणार होता. पण इतका खर्च त्यांना परवडणारा नव्हता.

शासनाच्या योजनेमुळे मिळाली नवसंजीवनी

म्हणून रूदुराजच्या पालकांनी शासकीय योजनांचा शोध घेण्यास सुरुवात केली व त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळाले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाच्या वर्षा वाघमारे यांनी आरोग्य तपासणी आणि कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया (Cochlear Implant Surgery) करण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी त्यांना सर्वतोपरी मदत केली. या योजनेमुळे रूदुराजवर शासकीय खर्चातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. ही योजना या बाळासाठी नवसंजीवनीच ठरली आहे.

मुलावर झाले मोफत उपचार

पुण्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये कॉक्लियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. या उपचारांनंतर आता रूदुराजला व्यवस्थित ऐकू येत आहे. यामुळे आमचे आयुष्यच बदलल्याची भावना त्याच्या पालकांनी व्यक्त केलीय.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेची माहिती

  • राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेंतर्गत जन्मतःच व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता (Malnutrition), शारीरिक व मानसिक विकासामध्ये (Physical And Mental Development) विलंब व अन्य आजारांचे निदान तसेच उपचार केले जातात.
  • या योजनेंतर्गत दरवर्षी अंगणवाडी बालकांसाठी (Anganwadi) दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते. 
  • किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात. गंभीर आजाराचे निदान झालेल्या मुलांवर जिल्हा रुग्णालय/ महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार (Free Health Services) करून त्याचा पाठपुरावा केला जातो.
  • जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ (National Child Health Programme) जिल्ह्यांत राबवला जातो. ज्या बालकांमध्ये आजारांचे निदान होते, त्या बालकांवर पालकांच्या परवानगीने मोफत वैद्यकीय उपचार केले जातात.

Content/Photo Credit : महासंवाद वेबसाइट

शुद्ध-नैसर्गिक मध खरेदी करायचंय? मग कोल्हापुरातल्या या गावाला नक्की द्या भेट

वाचनाची आवड आहे? राज्याच्या या शहरात उभारलीय चक्क पुस्तकांची बाग

Success Story : कलेतून घडवला स्वतःचा बिझनेस, वाचा माळशेज घाटातील तरूणाची प्रेरणादायी कहाणी