सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ विभागाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ विभागाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. "माझ्या खात्याचा निधी मनमानी पद्धतीने वर्ग करता येत नाही. अशा गोष्टी कायदेशीर नाहीत. अर्थ खातं जणू काही सर्वसत्ताधारी असल्याप्रमाणे वागत आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर या गोष्टी टाकणार आहोत. हे सहन केले जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

"संपूर्ण निधीच कापा!" – शिरसाटांचा रोष

शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं, "लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा अनुक्रमे ४१० कोटी आणि ३३५ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास खात्याकडे वळवला गेला आहे. मला याची माहितीही नव्हती. जर माझ्या खात्याचा उपयोगच होणार नसेल, तर संपूर्ण निधीच कापा!"

"आदिवासी खात्याचा काय उपयोग?"

संजय शिरसाट यांनी आदिवासी विकास खात्यावरील निधी कपातीनंतर प्रश्न उपस्थित केला की, "जर या खात्याचा निधी दुसऱ्या योजनेसाठी वापरणार असाल, तर हे खातेच बंद करा. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी हा निधी आहे. इतर खात्यांकडून का घेत नाहीत पैसे?"

सरकारच्या निर्णयावर टीका

राज्य सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती आणि जमातीसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आहे. मात्र लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधीतून दरमहा रक्कम वळती केली जाणार असल्याची माहिती असून, यावरच शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे.