- Home
- Maharashtra
- मुंबई-पुणे प्रवास सुसाट! १० रेल्वे फाटकं होणार इतिहासजमा; पाहा काय आहे मध्य रेल्वेचा 'मास्टर प्लॅन'
मुंबई-पुणे प्रवास सुसाट! १० रेल्वे फाटकं होणार इतिहासजमा; पाहा काय आहे मध्य रेल्वेचा 'मास्टर प्लॅन'
Mumbai Pune train travel time: मध्य रेल्वेने मुंबई-पुणे प्रवास वेगवान करण्यासाठी कल्याण ते लोणावळा दरम्यानची १० रेल्वे फाटकं बंद करण्याचा निर्णय घेतला. या फाटकांच्या जागी उड्डाणपूल व भुयारी मार्ग उभारल्याने एक्सप्रेस गाड्या, लोकलच्या वेळेत बचत होणारय

मुंबई-पुणे प्रवास सुसाट! १० रेल्वे फाटकं होणार इतिहासजमा
मुंबई: मुंबईकर आणि पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी एक मोठा धाडसी निर्णय घेतला आहे. कल्याण ते लोणावळा दरम्यानचे १० रेल्वे फाटक आता कायमची बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी आधुनिक उड्डाणपूल (ROB) आणि भुयारी मार्ग (RUB) उभारले जाणार आहेत. यामुळे रेल्वेचा खोळंबा थांबणार असून प्रवासाचा वेग प्रचंड वाढणार आहे.
नेमका फायदा काय होणार?
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, एका फाटकामुळे गाडीला साधारण ८ ते १० मिनिटांचा उशीर होतो. १० फाटकं बंद झाल्यामुळे मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या आणि कर्जत-खोपोली लोकलच्या वेळेत मोठी बचत होईल.
वेगवान प्रवास: वारंवार ब्रेक लावण्याची कटकट संपणार.
वेळेची बचत: कर्जत-खोपोली लोकल आता 'राईट टाईम' धावणार.
सुरक्षेला प्राधान्य: फाटकांवरील मानवी हस्तक्षेप संपल्याने अपघातांचे प्रमाण शून्यावर येईल.
इंधनाची बचत: गाड्यांचा वेग कायम राहिल्याने रेल्वेच्या ऊर्जा वापरातही बचत होईल.
प्रकल्पाचा खर्च आणि कालावधी
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मध्य रेल्वे सुमारे १८३ कोटी रुपये खर्च करणार आहे. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे भविष्यात मुंबई-पुणे अंतर तांत्रिकदृष्ट्या अधिक कमी झाल्याचा अनुभव प्रवाशांना येईल.
कुठे होणार हे बदल? (पाहा यादी)
प्रकल्पानुसार खालील ठिकाणी उड्डाणपूल उभारले जातील.
भिवपुरी - कर्जत: ३ पूल
बदलापूर - वांगणी: २ पूल
वांगणी - शेलू: २ पूल
नेरळ - भिवपुरी: २ पूल
शेलू - नेरळ: १ पूल
रेल्वे फाटकांचे अडथळे दूर झाल्यामुळे कर्जत-खोपोली पट्ट्यातील प्रवाशांचा दररोजचा मनस्ताप कमी होणार असून मुंबई-पुणे इंटरसिटी प्रवास अधिक गतीमान होईल.

