
Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याशी विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांनी चर्चा केली. राज्यात सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्रांचे वाटप करावे आणि प्रलंबित प्रमाणपत्रे व व्हॅलिडिटीची प्रक्रिया 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देण्याची प्रक्रिया राबवावी, तसेच सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि बॉम्बे गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी GR काढावा, अशीही त्यांनी मागणी केली. मराठा समाजासाठी जाहीर केलेल्या OBC सवलती, विद्यार्थ्यांच्या फी आणि सुविधा, प्रलंबित नियुक्त्या, MPSC संबंधित प्रश्न, आंदोलनातील प्रकरणे मागे घेणे, बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबांसाठी निधी व नोकरी, सारथीच्या योजना आणि महामंडळाचा निधी या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.नोंद असूनही कुणबी प्रमाणपत्र न मिळालेले, प्रमाणपत्र असूनही व्हॅलिडिटी प्रलंबित असलेले तसेच हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज करूनही प्रक्रिया पूर्ण न झालेले नागरिक आणि प्रलंबित व्याज परताव्याचे अर्जदार यांनी 28 ऑगस्टला अर्जांच्या प्रती घेऊन अंतरवालीत यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.सरकारसोबत चर्चा झाली असली तरी 29 ऑगस्टचे आंदोलन थांबणार नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन निर्णायक करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.